राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर, दूधगंगा वेदगंगा प्रथम

पुणे – को-जनरेशन ऑफ इंडिया या संस्थेने राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार जाहीर केले, असून कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. सांगलीच्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याला द्वितीय आणि सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास तृतीय पुरस्कार जाहीर झाला.
येथील साखर संकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेतको-जनरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, दूधगंगा वेदगंगा कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह अन्य साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
पारितोषिक वितरण २७ ऑगस्टला सकाळी दहा वाजता मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार आणि केंद्रीय सहसचिव बायोमास दिनेश जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहकारी आणि खासगी क्षेत्रासाठी कमी व जास्त दाब असणाऱ्या बॉयलर आधारित प्रकल्पाकरिता स्वतंत्र पारितोषिके देण्यात येतील, असे खताळ यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहवीज निर्मिती पुरस्कार प्राप्त प्रकल्पांची नावे
(जास्त दाब बॉयलर आधारित सहकारी प्रकल्प) :
प्रथम– श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री (ता. कागल) कोल्हापूर,
द्वितीय– डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना सांगली,
तृतीय – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर.
(कमी दाब बॉयलर आधारित सहकारी प्रकल्प) :
प्रथम– श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर,
द्वितीय– चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी कर्नाटक,
तृतीय – श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कोल्हापूर.
(जास्त दाब बॉयलर आधारित खासगी प्रकल्प) :
प्रथम– दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज युनिट श्री दत्त कोल्हापूर,
द्वितीय– पोन्नी शुगर्स नमक्कल तमिळनाडू,
तृतीय – गंगाखेड शुगर अँड एनर्जी परभणी.
देशात सहवीज निर्मिती प्रकल्पांद्वारे ग्रामीण भागात सुमारे २० हजार कोटींची आर्थिक उलाढाल होत आहे. यासोबतच हरित ऊर्जा निर्मिती, ग्रामीण रोजगार, छोट्या आणि मध्यम लघु उद्योजकांना काम होण्यास मोठा हातभार प्राप्त होत आहे, अशी माहिती दांडेगावकर यांनी दिली.
केंद्र सरकारने नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचे २०२२ पर्यंत १७५ गिगावॅटचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास आणि लघु जलविद्युत ऊर्जा यांचा समावेश आहे. सहवीज (को-जनरेशन) हे बायोमास ऊर्जा अंतर्गत हरित व नवीन करणे ऊर्जेचे महत्त्वाचे स्त्रोत आहे. साखर कारखान्यांमध्ये बगॅसचा वापर करून सहवीज निर्मिती केली जाते. अशा सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून ग्रामीण भागात तयार होणाऱ्या विजेचे वितरण करताना वीज वहनामधील गळतीचे प्रमाणही कमी आहे.
देशातील ७३२ साखर कारखान्यांपैकी सुमारे ५२३ साखर कारखाने गाळप हंगाम घेतात. अशा कार्यरत कारखान्यांपैकी ३६० कारखान्यांनी बगॅस आधारित सहवीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. या माध्यमातून सात हजार ५६२ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. देशातील ५५० साखर कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे १४ हजार मेगावॅट वीज उत्पादन करण्याची क्षमता आहे. साखर कारखान्यांमधून सद्य:स्थितीत ५.७६ दशलक्ष युनिट वीज प्रतिवर्षी तयार होते. ऊस गाळप हंगामातील १८० दिवस आणि गाळप हंगाम बंद झाल्यानंतर ६० दिवस असे एकूण २४० दिवसांत तयार होते.