गाळप, उत्पादन, उताराही घटला; राज्यातील १४५ कारखान्यांचा हंगाम संपला!
पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०० पैकी तब्बल 145 सहकारी, खासगी कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपला आहे. गतहंगामाच्या तुलनेत यंदा 84 कारखान्यांनी उसाअभावी लवकरच हंगाम संपविला आहे. तसेच गतहंगामाच्या तुलनेमध्ये गाळप, साखर उत्पादन आणि साखर उतारा घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता कारखान्यांना आर्थिक देणी भागविताना कसरत करावी लागणार आहे.
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 11 मार्च 2025 अखेर एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले असून त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या साखर कारखान्यांनी 829.9 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 781.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.42 टक्के इतका आहे.
राज्यात एकूण 145 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. या मध्ये कोल्हापूर विभागातील 35, पुणे विभागातील 20, सोलापूर विभागातील 43, अहिल्यानगर विभागातील 12, छत्रपती संभाजीनगर विभागातील 15 तसेच नांदेड विभागातील 20 कारखान्यांचा समावेश आहे.
मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 996.98 लाख टन उसाचे गाळप करून 1007.84 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 10.11 टक्के इतका होता. एकूण 61 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.
कोल्हापूर विभागात 40 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 26 सहकारी आणि 14 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 201.56 लाख टन उसाचे गाळप केले असून, 222.95 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 11.06 टक्के साखर उतारा आहे. विभागातील 35 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 195.17 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 185.89 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.52 टक्के आहे. या विभागातील 20 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
सोलापुर विभागात 45 कारखाने कार्यरत असून यामध्ये 17 सहकारी आणि 28 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 130.24 लाख टन उसाचे गाळप करून 105.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8.11 टक्के आहे. विभागातील 43 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 111.37 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 98.38 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.83 टक्के आहे. या विभागातील 12 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 80.2 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 64.09 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 7.99 टक्के आहे.या विभागातील 15 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 97.21 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.64 टक्के साखर उताऱ्यासह 93.69 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 20 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 10.86 लाख टन उसाचे गाळप केले असून, 9.63 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.87 टक्के आहे.
नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 3.29 लाख टन उसाचे गाळप करून 1.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.17 टक्के इतका आहे.