मराठवाड्यात उसाचा महापूर!

मराठवाड्यात उसाचा महापूर! सव्वाकोटी टन गाळप, २.१ कोटी क्विंटल साखर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांतील २२ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगामात तब्बल १ कोटी २१ लाख ३४ हजार ४०६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून २.१ कोटी ८ हजार ६२२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम १५ दिवस आधी म्हणजे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला होता. विभागातील २५ कारखाने प्रत्यक्ष गाळप करत असून, त्यापैकी १४ सहकारी व ९ खासगी कारखाने आहेत. देवगिरी सहकारी कारखान्याला परवाना मिळूनही गाळप सुरू झालेले नाही.
उतारा ८.५७ टक्के
गाळपातून मिळालेल्या साखरेचा उतारा सरासरी ८.५७ टक्के असल्याचे प्रादेशिक कार्यालयाने सांगितले. मार्चअखेर विभागातील १९ कारखाने गाळप बंद झाले असून, सध्या फक्त सहा कारखाने कार्यरत आहेत. पुढील पंधरवड्यात हे कारखानेही बंद होण्याची शक्यता आहे.





