अधिक ऊस मिळवण्यासाठी बक्षीस योजना

सोलापूर : गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, त्यासाठी ही प्रोत्साहानपर बक्षीस योजना आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक ऊस गाळप करणाऱ्या टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने आधीच दर जाहीर करुन कोंडी फोडली होती. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ५५० रुपये दर जाहीर केला. सोबतच शंभर टनाहून अधिक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना केली आहे. त्यानंतर भीमा सहकारी कारखान्याने एफआरपी पेक्षा १२५ रूपये दर जाहीर केला.
पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याने शंभर टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला प्रति टन दहा रूपये, अडीचशे टनासाठी पंधरा रूपये, पाचशे टनासाठी २५ तर एक हजार टनासाठी ५० रूपये प्रति टन बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला फायदा होईल; असे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.