शरद पवारांनी साखर कारखाना होऊ दिला नाही : अजितराव घोरपडे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : कवठेमहांकाळचा कारखाना आर. आर. पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठेमहांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर. आर. पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या, शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होवू दिला नाही. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले. आधी पिठाची चक्कीही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्नं दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्सद्विवेकबुद्धीने विचार करुन मतदान करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.

संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित प्रचारसभेत घोरपडे बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा घोरपडे व संजयकाकांसमोर मांडला. सर्वच ग्रामस्थांनी कवठेमहांकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली. यावर अजितराव घोरपडे म्हणाले, कवठेमहांकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडीमध्ये मी होतो. कारखाना सुरळीत सुरू होता. मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला. मी शरद पवारांची भेट घेतली व हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली. त्यावर आर. आर. पाटील ऐकत नाहीत, असे मला त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी तीच आहे, पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे. खरं बोलणारा व आपल्या बोलण्यावर ठाम राहणारा अजित पवारसारखा नेता मिळालेला आहे. त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »