कारखान्यांच्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना द्या, साखर आयुक्तांना ‘आंदोलन अंकुश’चे निवेदन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर व उप पदार्थांना गेली दोन वर्ष चांगला दर मिळाल्यामुळे साखर कारखाने मोठ्या फायद्यात आले आहेत. त्या नफ्यातील वाटा दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ च्या शिष्ट मंडळाने साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांची सोमवारी भेट घेऊन केली.

या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या वर्षी खोडवा उसाचे एकरी उत्पादन कमी झाले व मशागत खते, औषधे, मजुरीचे दर वाढल्यामुळे उसाचा उत्पादन खर्चही मोठया प्रमाणात वाढला आहे. उत्पादन खर्च वाढीच्या तुलनेत उसाची एफआरपी अल्प प्रमाणा वाढल्याने ऊस शेती तोट्यात गेली असून शेतकऱ्यांना पीक कर्ज सुद्धा फेड करता आलेले नाही.

शासनाने इथेनॉलला चालना देण्याचे धोरण घेतल्यापासून सर्वच साखर कारखान्यांना मळी विक्रीतून व जे कारखाने इथेनॉल निर्माण करतात त्यांना अतिरिक्त फायदा होत आहे. त्या फायद्यातील वाटा शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असून वाढलेल्या साखर दरातील जादा रक्कम शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून मिळाली पाहिजे , अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केली.

यावर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे. त्याला नव्याने लागण करण्यासाठी सध्या पैशाची गरज आहे. राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे साखर विक्रीतून व उप पदार्थ विक्रीतून जादा पैसे आज रोजी उपलब्ध आहेत ते शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात देण्याचे आपण आदेश द्यावेत, अशीही विनंती साखर आयुक्तांना यावेळी करण्यात आली.

साखर कारखान्यांनी तोडणी वाहतुकीच्या खर्चात नियमाच्या बाहेरचे खर्च टाकून खर्च वाढवले आहेत. या खर्चाचे प्रमाणीकरण करताना विशेष लेखा परीक्षकांनीसुद्धा अशा खर्चाना डोळे झाकून मान्यता दिली आहे, त्यातून शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपये कारखान्यांनी लुबाडले आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच शासकीय लेखा परीक्षकांना तोडणी वाहतुकीच्या खर्चाचे शासनाच्या नियमाप्रमाणे पुन्हा प्रमाणीकरण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी साखर आयुक्ताना केल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

कारखान्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य

शासनाने निर्धारित केलेली एफआरपी देऊन त्यांच्याकडे पैसे असतील तर ते देण्याचे कारखान्यांना स्वातंत्र्य आहे
त्यानुसारच पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, धनाजी माने, आप्पा कदम, प्रमोद बाबर, बाळासाहेब भोगावे, सुनील बाबर, मलगोंडा चौगुले, आनंदा भातामारे, महेश जाधव, संभाजी निंबाळकर, पोपट संकपाळ, महादेव काळे आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »