धोके ओळखा, कारण साखर कामगारांच्या गळ्याला बसतोय विळखा!

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले श्री. भास्कर घुले यांचे हे वाचनीय सदर
‘मी साखर कारखाना बोलतोय ‘ (भाग 9)
माझे काही बरे – वाईट झाले, तर त्याचा पहिला फटका बसतो तो साखर कामगारांना. जिथे माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, नियमितपणे गाळप सुरू आहे, तेथे सर्व आलबेल असते. माझ्या चांगल्या चालण्याचा फायदा हा सर्वांनाच होत असतो; पण माझी प्रकृती सगळीकडे उत्तमच आहे, असे नाही. हे तुम्ही सर्वजण पाहतच असता.
काही ठिकाणी माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असते. तर काही ठिकाणी मी आजारी पडलेला असतो आणि काही ठिकाणी तर आजारी पडून बंदही पडलेलो असतो. मी आजारी किंवा बंद पडण्याला एखादाच घटक जबाबदार नसतो. माझ्या आजारी पडण्याची कारणे काहीही असली, तरी त्यामुळे सर्वांचेच नुकसान होते. माझ्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक घटकांना त्याचा फटका बसतो. त्यात वेगवेगळे उद्योग व्यवसाय करणारे, छोटे व्यवसायिक, वाहतूकदार, ऊस तोडणी मजूर, ऊस उत्पादक शेतकरी, माझ्यासाठी काम करणारे साखर कामगार व इतरही अनेकांचा समावेश असतो.
सर्वाधिक फटका बसतो तो माझ्या साखर कामगारांना… सध्या स्पर्धेच्या युगात त्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळतेदेखील; परंतु पन्नाशी आलांडलेल्या आणि २०-२५ वर्षे सेवा बजावणाऱ्या कामागारांचे मोठे नुकसान होते. खरं तर या साखर कामगारांनी आतापर्यंत अत्यल्प पगारावर नोकरी केलेली असते; संपूर्ण आयुष्य काटकसर करतच जगत आलेला असतो. मुलांचे शिक्षण व लग्नकार्यांचा मेळ घालातना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे साखर कामगार रिटायरमेंटसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करू शकत नाही, मग इच्छा कितीही असो…

त्यांच्या सुदैवाने माझी परिस्थिती चांगली असेल तर मी त्यांना त्यांचा फायनल पगार, ग्रॅच्युइटी व त्यांचा पीएफ आदी देणी देऊ शकतो. ही शिदोरी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडणारी असते. अर्थात ही रक्कम फार मोठी नसते. तरीदेखील माझा साखर कामगार खूश असतो.
ज्याच्याकडे शेतीवाडी किंवा उत्पन्नाचे काही दुसरे साधन असते त्यांचे उत्तर आयुष्य सुकर ठरते. ज्यांची मुले शिक्षण पूर्ण करून उद्योग व्यवसाय किंवा नोकरीला लागलेले आहेत, त्यांचेही फारसे काही अडत नाही. परंतु त्यांच्या सेवेच्या उत्तरार्धात जर मी आजारी पडलो आणि बंद झालो, तर त्यांचे प्रचंड हाल होतात, मुलांचे शिक्षण अर्धवट राहिलेले असते. घरी शेतीवाडी काही नसते. उत्पन्नाचा इतर कोणताही स्रोत नसतो, अशा कामगारांना मरण यातना भोगाव्या लागतात. त्याचे मला अतीव दुःख होते.
पीएफ देणेही होते अवघड
साखर कारखाना बंद पडण्याची कारणमीमांसा खूप मोठी आहे. त्यावर मी मुद्देसूदपणे बोलणारच आहे. मी कधीच अचानक बंद पडत नाही. प्रथम माझी आर्थिक प्रकृती खंगत जाते. माझ्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यातूनही माझी चालक मंडळी कसा तरी मार्ग काढून मला चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांची देणी चुकती करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचवेळी कामगारांचे पगार थकले जातात.
सुरुवातीला महिने दोन महिने आणि नंतर काही वर्षापर्यंत पगार थकतात. मला भविष्य निर्वाह निधीचे पैसे देणे सुद्धा शक्य होत नाही. रिटायर होतानाही कामगाराला पीएफ मिळत नाही. बऱ्याचदा माझी प्रक़ृती खालावल्याने कामगारांवर सक्तीची रिटायरमेंट घेण्याची वेळ येते. अशावेळी जे तरुण साखर कामगार असतात ते इतर ठिकाणी नोकरी शोधतात व त्यांचा मार्ग ते पुढे चालू ठेवतात; परंतु ज्या कामगारांची इथून पुढे नोकरी करण्याची क्षमता राहत नाही आणि पगार थकल्यामुळे त्यांच्यावर हळुहळू मोठ्या प्रमाणावर कर्ज झालेले असते. काही दिवस ते वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेऊन आपला प्रपंच सावरण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कर्ज ते कर्ज असते ते येनकेन प्रकारे फेडावेच लागते.
मी ज्यावेळी कामगारांची देणी देऊ शकत नाही, त्यांची तगमग ही पाहू शकत नाही, त्यावेळी मी हताश होतो, उद्विग्न होतो. उदास होतो. यापलीकडे माझ्या हातात काहीच राहात नाही. फायनल पेमेंट नाही, ग्रॅच्युईटी नाही, रजेचा पगार नाही की पीएफ नाही… अशा भयंकर परिस्थितीतून माझा कामगार बांधव जातो.
तो जर कॉलनीमध्ये राहात असेल, तर रिटायरमेंटनंतर त्याला घर सोडावे लागते. म्हणजे डोक्यावरचे छप्परही जाते. मुलांचे शिक्षण, आजारपण अशा अनेक अडचणींनी तो आधीच भरडलेला असतो. अशावेळी या कामगारांनी करायचे तरी काय?
नोकरीसोबत पतही जाते
तुमच्याकडे काहीही नाही म्हटल्यावर समाजात देखील त्यांना कोणी जवळ करत नाही. नोकरीत असताना किमान समाजामध्ये थोडी फार तरी किंमत असते; परंतु नोकरीबरोबर तीही निघून जाते. समाजामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक व सामाजिक पत शिल्लक राहत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना मिळेल तो रोजगार शोधावा लागतो. मग काही शेतमजूर होतात. तर काही आपले स्वतःचे जीवन संपवण्याचाही विचार करतात. इतकी दुरवस्था माझ्या साखर कामगारांची माझ्या बंद पडण्याने होत असते.
साखर उद्योग क्षेत्रातील माझ्याशी संबंधित इतर घटकांसमोर काही पर्याय असतात. त्यामुळे ते कसे तरी सावरतात. माझ्या कामागारांसमोर मात्र कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे सर्वाधिक फटका माझ्या याच बांधवाला बसतो.
कामगारांची देणी देण्याचा विचार अभावानेच
मला स्वत:ला वाटतं म्हणून मी बंद पडतो का? कधीच नाही… बऱ्याच वेळा मी अडचणीत येण्यासाठी निसर्गदेखील जबाबदार असतो. माझे अर्थचक्र पर्जन्यमानावर अवलंबून असते. कधी कधी पर्जन्यमान व ऊस पिक मुबलक असून देखील इतर काही मानवनिर्मित कारणांमुळे मला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. मग हा सामना करता करता मी हळुहळू इतका बेजार होतो की शेवटची घटका मोजायला लागतो. मी बंद पडत असताना मला मदतीची हातही पुढे येतात. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. तरीदेखील ते प्रयत्न अपुरे पडल्याने मी आजारी पडून बंदच पडतो. मी चालू असताना माझ्या कार्यक्षेत्रात व परिसरात जी धामधूम असते जे वैभव असतं, ते वैभव माझ्याबरोबरच संपून जाते. माझी अवस्था पडक्या वाड्यासारखी होते.
माझे जुने भरभराटीचे दिवस पुन्हा आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून माझ्यासाठी दुसरा मालक शोधला जातो. म्हणजे माझी विक्री होते. पण मोबदला ठरवत असताना जुने जे माझे दायित्व असते किंवा मला देणे असते त्याचा विचार अभावानेच होतो. साखर कामगारांच्या देण्यांची जबाबदारी घ्यायला कोणी उत्सुक नसते. माझ्या धनको बँकेची भावना अशी असते की जमेल तेवढी स्वत:ची वसुली करून घ्यावी.
माझ्या नव्या स्वरूपात सर्व काही बदलेले असते. माझे कामगारही नवेच असतात. जुन्या कामगारांचे देणे नव्या मालकाला ओझे वाटते. त्यामुळे त्याकडे सकारात्मपणे पाहिले जात नाही. मला वाटते की, जुनी देणी भागवणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसेलही; पण सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या विचार करून ती देणी द्यावी, जेणेकरून या ‘पुनर्जन्मा’त मला कोणाचा तळतळाट लागणार नाही. शिवाय भविष्यात मला पुन्हा वाईट दिवस येणार नाहीत याची सर्वजण दक्षता घेतील.
माझा ठाम समज आहे की, सर्व साखर कामगार समजदारच असतात. मी आजारी पडतो तेव्हा ते मला जिवंत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. काही वेळेला आपली थकलेली आर्थिक येणी तडजोड करून कमीसुद्धा करतात किंवा प्रसंगी सोडूनही देतात… पण माझे चक्र सुरूच राहावे यासाठी चालकांना मदत करतात.
अडचणीच्या क्षणी असमंजसपणाची भूमिका घेणाऱ्या काही निवडक कामगारांना मला यानिमित्ताने एक कळकळीची विनंती करायची आहे… माझा गाडा नीटपणे सुरू असताना, अशा साखर कामगारांनी टोकाची भूमिका घेऊन, अवास्तव मागण्या करू नयेत. कारण मी अडचणीत आलो तर अंतिमत: तुमचेच सर्वाधिक नुकसान होणार आहे.
पुन्हा उभारी घेण्याची क्षमता तुमच्यामुळेच शक्य
मी कितीही गंभीर आजारी पडलो, तरी पुन्हा उभारी घेणे शक्य आहे. मात्र त्यासाठी लागेल सर्वांचे सहकार्य… थोडासा संयम आणि सामंजस्य…. माझे चालक, माझे साखर कामगार, माझे सभासद व माझ्या कार्यक्षेत्रात ऊस पिकवणारे शेतकरी यांच्या पाठिंब्यावर मी पूर्वपदावर येऊ शकतो. त्यासाठी फार नाही, तर अवघ्या एक-दोन गाळप हंगामांसाठी सर्वांनी समंजस भूमिका घेत थोडा त्याग केला, तर मार्ग निघतोच आणि पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात.
माझ्या मनात एक सल आहे. माझे अर्थचक्र जेव्हा उत्तमपणे सुरू असते, तेव्हा सर्वच घटक त्याचा चांगला लाभ घेतात. मी सर्वांनाच तृप्त करत असतो. पण जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येते, तेव्हा कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित असते. मात्र संबंधित घटक हात वर करतात. एकमेकांवर दोषारोप करत माझा बळी दिला जातो. खरं तर असं व्हायला नको. सर्व घटकांनी एकत्र येऊन साखर कारखानदारीतील धोक्यांचा अंदाज घ्यायला हवा आणि उपाययोजनांचा डोस वेळीच द्यायला हवा. कारण मी कधीच अचानक आजारी पडत नाही, त्याची लक्षणे खूप आधीच दिसायला लागतात.
पुढील लेखात आपण कामगारांविषयी अपूर्ण राहिलेली चर्चा पूर्ण करू, तसेच मला सुदृढ होण्यासाठी कुठले औषध व कुठले टॉनिक रामबाण ठरू शकते, याचाही उहापोह करू.
(लेखक भास्कर घुले हे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत.)