ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे.

या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे भविष्य क्रूड तेलाऐवजी आपण नेहमी पिकवत असलेल्या गोष्टीतून आले तर?. ही संकल्पना बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड (BCML) च्या कार्यकारी संचालक अवंतिका साराओगी यांच्या दूरदृष्टी आणि त्यांच्या आजीच्या (ज्यांना ‘मॅडमजी’ म्हणत असत) वारशातून जन्माला आली आहे. अवंतिका यांनी त्यांच्या आजीकडून कंपनीचा ऊस-आधारित व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर, त्यांनी उपलब्ध संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करावा यावर विचार केला. त्यांना एकदा ऊसापासून बनवलेली बाटली दिसली, ज्यावर ‘मी वनस्पतींपासून बनवली आहे’ असे लिहिले होते, तेव्हा त्यांना ही कल्पना सुचली.
ब्रँड ‘बलरामपूर बायोयुग’ चे औपचारिक उद्घाटन २७ मे २०२५ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे संयंत्र ऑक्टोबर २०२६ मध्ये कार्यान्वित (commission) होईल. हे संयंत्र उत्तर प्रदेशातील कुंभी येथे असेल.
हे संयंत्र पूर्णपणे नूतनीकरणक्षम (renewable) ऊर्जेवर (बगॅस किंवा इतर शेती कचरा) चालेल. बीसीएमएलच्या मते, हे ऊसापासून पीएलए बनवणारे जगातील पहिले एकाच ठिकाणी असलेले संयंत्र असेल.
भारतासाठी या उपक्रमाचे महत्त्व:
- भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा ऊस उत्पादक देश आहे, जिथे दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक ऊस पिकवला जातो.
- ऊसापासून साखर, गूळ, रस याशिवाय बगॅस, मोलॅसिस आणि प्रेस मड यांसारखे मोठ्या प्रमाणात शेतीचे उप-उत्पादन (agricultural residue) मिळते, ज्याचा अनेकदा पुरेपूर वापर होत नाही.
- त्याच वेळी, भारत दरवर्षी ५ दशलक्ष टनांहून अधिक सिंगल-यूज प्लास्टिक कचरा तयार करतो, ज्यापैकी बराचसा कचरा नॉन-रिसायकलेबल असतो आणि पर्यावरणात टिकून राहतो.
- पीएलए सारखे बायोप्लास्टिक हे बॅन केलेल्या सिंगल-यूज प्लास्टिक वस्तूंसाठी आणि पॅकेजिंग, बायो-मेडिकल, फूड सर्व्हिस वेअर यांसारख्या उद्योगांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
ऊस ते प्लास्टिक प्रक्रिया (How Sugarcane becomes Plastic):
ही प्रक्रिया विज्ञान आधारित असून अत्यंत कार्यक्षम आहे. बीसीएमएल च्या केमिकल डिव्हिजनचे अध्यक्ष, स्टीफन बारोट यांच्या मते, ही प्रक्रिया सोपी आहे.
- किण्वन (Fermentation): ऊसाच्या रसातील साखरेचे किण्वन (दही किंवा वाइन बनवण्यासारखे) केले जाते. या प्रक्रियेतून लॅक्टिक ऍसिड तयार होते.
- शुद्धीकरण (Purification): हे लॅक्टिक ऍसिड हानिकारक रसायनांशिवाय शुद्ध केले जाते.
- डायमरायझेशन (Dimerisation): लॅक्टिक ऍसिडमधून पाणी काढून डायमर बनवले जाते.
- पॉलिमरायझेशन (Polymerisation): या डायमरला लांब साखळ्यांमध्ये जोडून पीएलए रेझिन तयार केले जाते. या रेझिनपासून बाटल्या, कंटेनर, भांडी बनवता येतात.
पीएलए चे फायदे:
- पारंपरिक प्लास्टिकच्या विपरीत, जे शेकडो वर्षे टिकते, पीएलए विघटित होण्यासाठी डिझाइन केले आहे.
- औद्योगिक कंपोस्टिंग सुविधांमध्ये (जिथे योग्य उष्णता, आर्द्रता आणि सूक्ष्मजीव असतात), पीएलए १८० दिवसांत विघटित होते. प्रत्यक्षात ते काही आठवड्यांतच विघटित होऊ शकते.
- ऊस, मक्याच्या तुलनेत, प्रति चौरस मीटर अधिक साखर उत्पादन देतो, ज्यामुळे तो बायोप्लास्टिकसाठी एक कार्यक्षम कच्चा माल ठरतो.
- नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालणारे हे संयंत्र पारंपरिक प्लास्टिकच्या (PET) तुलनेत ८०% पर्यंत कमी कार्बन फूटप्रिंट साध्य करू शकते.
शेतकऱ्यांचे योगदान आणि परिणाम:
बीसीएमएलशी संबंधित ५.५ लाख शेतकरी या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या ऊसाशिवाय हे संयंत्र काहीच कामाचे नाही. शेतकऱ्यांना सुरुवातीला प्लास्टिक किंवा कंपोस्टिंगबद्दल माहिती नसली तरी, आता त्यांना बायोप्लास्टिक संयंत्रासाठी ऊस पिकवण्याचा अभिमान वाटतो. या संयंत्रामुळे थेट २५० नोकऱ्यांची निर्मिती झाली असून, नियोजित बायोप्लास्टिक्स क्लस्टरमधून आणखी २००० नोकऱ्यांची अपेक्षा आहे. हे ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांनाही मदत करते.
चक्रीयता आणि भविष्यातील दृष्टी:
खरी चक्रीयता (Circularity) केवळ उत्तम उत्पादनाने साध्य होत नाही, तर वापल्यानंतर कचरा कसा हाताळला जातो यावर अवलंबून असते. यासाठी घरगुती स्तरावर कचरा विलगीकरण (waste segregation) आवश्यक आहे. बीसीएमएल कंपोस्टिंग आणि केमिकल रिसायक्लिंगमधील मॉडेल प्रकल्पांवर सरकारसोबत भागीदारी करत आहे.
स्टीफन बारोट यांच्या मते, भारताकडे बायोमास (biomass) आणि दृढनिश्चय आहे. भारत बायोप्लास्टिक आणि बायोकेमिकलचे जागतिक केंद्र बनू शकतो. ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, बायोयुग संयंत्र दरवर्षी ८०,००० टन पीएलए उत्पादन करेल. अवंतिका साराओगी भविष्यात पीएलएची क्षमता वाढवण्यासोबतच इतर बायोमटेरिअल्स आणि ग्रीन केमिकल्सवरही लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्यासाठी, शाश्वतता ही केवळ एक रणनीती नाही, तर ती व्यवसायाची नैसर्गिक पद्धत आहे.
(सविस्तर लेख : शुगरटुडे जून २०२५ च्या अंकात)
(द बेटर इंडियावरून साभार)