ऊस क्षेत्र १७ टक्क्यांनी घटले, सर्वात मोठी घट सोलापूर विभागात

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाचा श्रीगणेशा दोन महिन्यांवर आला असताना, कृषी विभागाने ऊस उपलब्धतेची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यातील ऊस क्षेत्र तब्बल २ लाख ४० हजार हेक्टरनी म्हणजे सुमारे १७ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे २०२४-२५ चा हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कृषी विभागाने साखर आयुक्तालयाशी विचारविमर्श करून हंगाम २०२४-२५ साठी किती ऊस उपलब्ध होऊ शकतो, याचा अंदाज नुकताच जाहीर केला. त्यानुसार गत हंगामात एकूण १४.०७ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. ते आता ११.६७ लाख हेक्टरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे गत पावसाळ्यात कमी झालेले पावसाचे प्रमाण हे आहे. यंदाच्या चांगल्या पावसाचा फायदा २०२५-२६ च्या हंगामासाठी होऊ शकेल.
सोलापूर विभागात मोठी घट
राज्यात ऊस क्षेत्राची सर्वात मोठी घट सोलापूर विभागात झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ही घट तब्बल ४२.२३ टक्के आहे, म्हणजे सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक ऊस क्षेत्र कमी झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात सुमारे ५७ टक्के, तर सोलापूर जिल्ह्यात २९ टक्के क्षेत्र कमी झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखर कारखान्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचाच पहिला क्रमांक लागतो हे येथे उल्लेखनीय.
सोलापूर विभागात सोलापूर आणि धाराशिव असे दोन जिल्हे येतात. धाराशिव जिल्ह्यात ५७.५ टक्क्यांची घट होणार आहे, तर सोलापूर जिल्ह्यात २८.६ टक्क्यांची. धाराशिवचा राज्यात पहिला क्रमांक दिसतो.
सोलापूर पाठोपाठ औरंगाबाद विभागाचा नंबर लागतो. या विभागात २९ टक्क्यांनी ऊस क्षेत्र घटेल, असा अंदाज आहे. या विभागात बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, ज़ळगाव, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो.
ऊस क्षेत्राबाबत कोल्हापूर विभागात मात्र तुलनेने चांगली स्थिती आहे. येथे सुमारे अडीच टक्क्यांनी क्षेत्र घटले आहे. मागच्या हंगामात ३.३२ लाख हेक्टरवर ऊस होता, आता तो ३.२४ लाख हेक्टर क्षेत्रावर आहे. त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात नगण्या घट आहे, सांगली जिल्ह्यात सुमारे पाच टक्के ऊस क्षेत्र घटले आहे. या विभागात सिंधुदुर्ग, ठाणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचाही समावेश होतो. मात्र तेथील ऊस क्षेत्र नगण्य असते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तेथे ऊस शेतीचे शून्य क्षेत्र आहे.
ऊस क्षेत्राचा आलेख २०१९-२० पासून सातत्याने वाढत आहे. १९-२० ला ८.२२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते, त्यापुढील वर्षी ११.४२, पुढे १४.८८, १४.८७ आणि २०२३-२४ च्या हंगामात त्यात किंचित घट होऊ ते १४.०७ लाख हेक्टरवर आले. यंदा त्यात प्रथमच मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.