निवृत्तीनंतर शेतीत रमणार : साखर संचालक भोसले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजकारणाचाही विचार करण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेत तब्बल २८ वर्षे सेवा बजावल्यानंतर मी शेती आणि सामाजिक कामांसाठी स्वत:ला वाहून घेणार आहे, असे प्रतिपादन साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी केले.

Dr. Sanjay Bhosale

कॉम्पिटिटर्स फाउंडेशनच्या वतीने संसदरत्न दिवंगत खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार डॉ. भोसले यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. या वेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुरुपती डॉ. पी. डी. पाटील, माजी मंत्री व राजीव सातव यांच्या आई रजनी सातव, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे प्रमुख विलास शिंदे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जायभाये, डॉ. मनोज मते, सचिव अॅड. विठ्ठल देवखिळे व विशेष पोलिस महानिरीक्षक (सीआयडी) संजय येनपुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.

आपण शेती जरूर करा, पण राजकारणातही येण्याचा विचार करा, असे आवाहन चव्हाण यांनी त्यांना केले. शेती माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे, त्यामुळे शेतीसाठी पूर्णवेळ देणे मला आवडेल, असे डॉ. भोसले म्हणाले.

प्रशासकीय सेवेतील वाटचालीचा आढावा डॉ. भोसले यांनी घेतला. श्री सुवर्ण सहकारी बँक कशी वाचवली याची माहिती त्यांनी दिली. एखादी सहकारी बँक सुस्थितीत आणून राष्ट्रीय बँकेत विलीनीकरण होण्याची देशातील ही पहिलीच घटना होती, त्यामुळे हजारो सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना न्याय देता आला, असे भावनिक उद्‌गारही त्यांनी काढले.

राष्ट्रवादीने सरकार पाडले, अन्यथा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असता…

सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता आला, तेवढा केला, राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला. त्याची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे सरकार पाडले. तेव्हा आमचे सरकार पडले नसते, तर भाजप सत्तेत आली नसती आणि मराठा आरक्षण देण्याचा प्रश्न तेव्हाच सुटला असता,” अशा शब्दांत माजी चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला.

चव्हाण म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेच्या शिस्तीचा देशात नावलौकीक होता. ती शिस्त आता राहिली नाही. राज्याचा सहकार विभाग शिस्तीसाठी प्रसिद्ध नाही, त्यामध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे. चांगल्या दर्जाचे अधिकारी शोधणे आत्ता कठीण झाले आहे. २५ टक्के चांगल्या अधिकाऱ्यांवर सध्या प्रशासन सुरू आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्राचे अति खासगीकरण झाले आहे, हा समतोल साधण्याची गरज असून, राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रातून हात काढून घेऊ नयेत.”

या कार्यक्रमाला डॉ. भोसले यांच्या सीए पत्नी सौ. अपर्णा, तसेच चिरंजीव हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर आदित्य हे पत्नी नीतिकासह उपस्थित होते. सौ. नीतिकादेखील फ्लाईंग ऑफिसर आहेत. तसेच डॉ. भोसले यांचे व्याही निवृत्त लष्करी अधिकारी श्री. मेहता हेदखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. भोसले यांना शुभेच्छा दिल्या. आदित्य यांनी त्यांच्या भाषणात वडिलांच्या कडक शिस्तीचा उल्लेख करत, मी त्यांच्यासारखाच बनायचा प्रयत्न करत आहे, असे सांगितले. त्यांच्या ओघवत्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.

डॉ. संजयकुमार भोसले ३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त होत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »