पाणी बचती बरोबरच उत्पादन वाढीसाठी ठिंबक सिंचनाला पर्याय नाही

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘डीएसटीए’च्या सेमिनारमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे : पाणीबचत साधण्याबरोबरच उसाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर ठिबक सिंचनाला पर्याय नाही, असा एकमुखी आग्रह ‘डीएसटीए’च्या परिसंवादात ऊससिंचन विषयातील तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. ठिबक सिंचनामुळे उत्पादनाची गुणवत्ताही सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत ठिबक पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ठिबक सिंचन (Drip Irrigation for Sugarcane) पद्धतीचा अधिकाधिक ऊस उत्पादनासाठी परिणामकारक वापर कसा करायचा, या विषयावर दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’ने शनिवारी एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केले होते. महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून साखर कारखान्यांचे प्रतिनिधी सेमिनारला उपस्थित होते.

सेमिनारची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. पहिल्या सत्रात सेमिनारमागील उद्देश स्पष्ट करण्यात आला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे, तर विशेष पाहुणे म्हणून म. फुले कृषी विद्यापीठातील अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, फलोत्पादन विभागाचे सहसंचालक राम फडतरे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष एस. डी. बोखारे, कृषी समितीचे समन्वयक डॉ. संजीव माने, सहसमन्वयक डॉ. सुरेश पवार, कार्यकारी सचिव गौरी पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नेटाफिम, जैन एरिगेशन, कोठारी ॲग्रोटेक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. गौरी पवार यांनी सूत्रसंचालन केले.

श्री. एस. बी. भड यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या कार्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला. तसेच सेमिनार आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. माने यांनी प्रस्ताविक केले. फडतरे यांनी सरकारच्या सूक्ष्म सिंचनाबाबत असलेल्या विविध योजनांची उदाहरणांसह माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून ३२.५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे, असे त्यांनी सांगितले. अधिकतम ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवता येऊ शकते, या योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे यांनी डॉ. भोंगळे यांनी भारतातील एकूण जलस्थितीचा आढावा घेताना, भविष्यात सर्वांना गंभीर पाणीसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पहिला फटका बसणारे क्षेत्र कृषीचे आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व ओळखा आणि नियोजन करा. ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनखेरीज सध्या दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही त्यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले.

दुसरे सत्र तांत्रिक होते. त्यात डॉ. दिलीप पवार, नेटाफिमचे उप सरव्यवस्थापक डॉ. अरुण देशमुख, शाहू साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी आर. एम. गंगाई, तसेच डॉ. भोंगळे यांनीही सादरीकरण केले. उत्पादनवाढ, उत्पादनाचा दर्जा सुधारणे ही दोन्ही उदिदष्टे साध्य करण्यासाठी ठिबक सिंचन हाच प्रभावी उपाय आहे आणि आपले सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे पाणी बचत, तेदेखील साध्य होते. त्यासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करा, असा सल्ला सर्वांनी दिला.

शेवटच्या सत्रात कोठारी ॲग्रीटेकचे सहा. सरव्यवस्थापक विजयकुमार सरूर, जैन एरिगेशनचे डॉ. बी. डी जडे, नेटाफिमचे व्यवसाय प्रमुख कृष्णात महामूलकर, कोठारी ॲग्रीटेकचे अयूब शेख, जैन एरिगेशनचे डॉ. विजय माळी यांचे मार्गदर्शन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »