साखर कारखाने बायो रिफायनरीज बनावेत : प्रो. जी. डी. यादव

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखाने यापुढे केवळ साखर आणि इथेनॉल सारखी उपउत्पादने बनवणारा उद्योग न राहता, ते बायो रिफायनरीज बनावेत, अशी अपेक्षा प्रख्यात तज्ज्ञ आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रो. डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केली.

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’च्या वतीने आयोजित सेमिनारमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (तंत्र) एस. डी. बोखारे, कार्यकारी सचिव गौरी पवार इ. ची उपस्थिती होती.

संस्थेच्या पुण्यातील (शिवाजीनगर) लालचंद हिराचंद सभागृहात पार पडलेल्या या सेमिनारचा विषय ‘हीट अँड मास बॅलन्स इन शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ हा होता. या सेमिनारमागील प्रयोजन आणि महत्त्व आदींबाबत श्री. भड यांनी प्रस्ताविकात माहिती दिली. सेमिनारला राज्य साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह, विविध साखर कारखान्यांचे अधिकारी आणि साखर क्षेत्रातील नामवंत मंडळींची उपस्थिती होती.

आयोजन समितीचे सदस्य व्ही. एम. भंडारी, बी. एच. श्रीकांत, यशवंत घारपुरे, वा. र. आहेर यांचीही उपस्थिती होती.

प्रो. डॉ. यादव म्हणाले की, यापुढे साखर कारखान्यांनी प्रामुख्याने ऊर्जा निर्मितीवरच म्हणजे ग्रीन एनर्जीवर भर द्यायला हवा. हायड्रोजन उत्पादनात या उद्योगाला मोठे भवितव्य आहे. नव्हे हायड्रोजन हेच भविष्य आहे. त्यादृष्टीने साखर उद्योगाने उद्याचे नियोजन करावे. केवळ इथेनॉल उत्पादन, कोजन यावर अवलंबून राहू नये.

साखर कारखान्यांनी भविष्यात बायो रिफायनरीज म्हणूनच विकसित व्हावे. साखर हा त्यांचा उपपदार्थ राहील. केवळ ऊस नव्हे, तर शेतातील जेवढे ‘वेस्ट’ आहे आणि सर्व प्रकारचे बायोवेस्ट यांचा फीडस्टॉक म्हणून वापर करून, ऊर्जानिर्मिती करावी, असे आवाहन करून डॉ. यादव म्हणाले की, यापुढे शेतकऱ्यांना या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवण्याच्या संधी निर्माण होणार आहे. त्यातील एक म्हणजे बायोमास. बायोमास डेन्सिफाय करून तो कारखान्यांना पुरवल्यास शेतकऱ्यांना भरघोस मोबदला मिळू शकणार आहे.

साखर कारखान्यांचे इथेनॉल उत्पादन २०३५ नंतर बंद व्हायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. बोखारे यांनी आभार मानल्यानंतर उद्‌घाटन सत्राचा समारोप झाला. त्याचे सूत्रसंचालन गौरी पवार यांनी केले.

दुसऱ्या तांत्रिक सत्रात हिंदुस्थान ॲन्टिबायोटिक्स माजी एमडी यशवंत घारपुरे, साखर तंत्रज्ञान सल्लागार एस. जी. आठवले, व्हीएसआयचे माजी सल्लागार एस. व्ही. बोरूडे, राज प्रोसेसेसचे बी. एस. पाणीकर यांनी मार्गदर्शन केले.

भोजनानंतरच्या सत्रात इक्विनॉक्सचे सीईओ अलोक पंडित, एमआयटी एओइचे प्रा. डॉ. एस. व्ही. तारळकर, इक्विनॉक्सचे व्हीपी (तंत्रज्ञान) डॉ. संजीव बाचल यांची सादरीकरणासह व्याख्याने झाली.
तसेच ‘हीट अँड मास बॅलन्स डायग्राम’वर इंजि. बंगळूरचे पी. के. सलोनी, त्रिवेणी टर्बाइन लि. चे प्रशांत धनपावडे (हेड वेस्ट झोन) यांचीही व्याख्याने झाली. तसेच सिमेन्सचे चिरायू शाह आणि विराज पवार यांनीही मार्गदर्शन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »