गाळप परवान्याविना चालणाऱ्या साखर कारखान्याला आयुक्तांचा दणका

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : गाळप परवाना न घेताच महिन्यापासून गळीत घेणारा एक साखर कारखाना रडारवर आला असून, त्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

हा खासगी साखर कारखाना आहे. त्याला आयुक्तांनी नोटीस जारी केली आहे.

गळीत हंगाम सुरू करताना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने (गोकुळ शुगर) परवाना न घेताच गाळप सुरू केले. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे, मात्र त्याने साखर आयुक्तालयाला कसलाही डेटा पाठवला नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर साखर आयुक्त डॉ. खेमनार यांनी त्याची गंभीर दखल घेत, कारखान्याला नोटीस पाठवली आणि आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई का करू नये, अशी विचारणा केली. याबाबत नुकतीच आयुक्तांसमोर सुनावणी झाली.

गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने कायदाभंग केल्याने, त्याला एक महिन्याच्या गाळपाच्या तुलनेत दंड भरावा लागणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिन ३५०० मे. टन आहे. याचा विचार करता, कारखान्याच्या दंडाची रक्कम काही कोटींमध्ये जाऊ शकते.

याबाबत साखर आयुक्त म्हणाले की, दंडाची रक्कम कितीही असली तरी ती कारखान्याला भरावी लागेल; अन्यथा फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल. विनापरवाना कारखाना सुरू करणे आणि गाळपाचा डेटा शासनाला न पुरवणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »