१७ लाख टन पुरे : केंद्र सरकारचा पुनरुच्चार

नवी दिल्ली : यंदाच्या संपूर्ण साखर हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी आधीच निश्चित केलेल्या 17 लाख टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करण्यास परवानगीची शक्यता केंद्राने नाकारली आहे.
या हंगामात (ऑक्टोबर 2023-सप्टेंबर 2024) 320-330 लाख टन साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज आहे, त्यामुळे मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारला 270-280 लाख टन साखर साठा देशी मार्केटसाठी हवा आहे. साखरेचे भाव वाढून सर्वसामान्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये, अशी यामागची सरकारची भूमिका आहे.
पुढील आठवड्यात “भारत तांदूळ” (Bharat Rice) लाँच करण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, साखरेची परिस्थिती चांगली आहे आणि एफआरपीची वाढ गृहित धरली तरी साखरेची भाववाढ होण्याची शक्यता नाही. मात्र इथेनॉलसाठी ठरलेल्या कोट्यापेक्षा जादाची साखर वळवण्यास परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही.
पश्चिम उत्तर प्रदेश पट्ट्यात उसाचे उत्पादन घटण्याच्या चर्चेबद्दल बोलताना, ते म्हणाले की राज्य सरकारने अशा कोणत्याही शक्यतेबद्दल केंद्राला माहिती दिली नाही आणि आतापर्यंत संपूर्ण राज्यात साखरेचे एकूण उत्पादन वर्षापूर्वीच्या कालावधीपेक्षा जास्त होण्याची आशा आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला 2023-24 हंगामासाठी साखर उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर करताना, इंडियन शुगर मिल्स असो.ने (ISMA) म्हटले आहे, की ते 10 टक्क्यांनी घसरून 330.5 लाख टन (इथेनॉलसाठी वळवलेल्या प्रमाणासह) होऊ शकते. तसेच साखरेची मुबलक उपलब्धता गृहिता धरता, सरकारकडून आणखी काही प्रमाणात साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा ISMA ने 31 जानेवारी रोजी व्यक्त केली होती.