साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार दशकांपासून ते साखर उद्योगाशी संबंधित आहेत. या नात्याने साखर उद्योगात सक्रिय आहेत. ते ‘विस्मा’चे संस्थापक सदस्य आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द तर खूप समृद्ध आहे. ते फुलंब्री मतदारसंघातून पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले. विविध मंत्रीपदे सांभाळली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. विविध सामाजिक आणि सहकारी संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत. या वयातही त्यांचा महाराष्ट्रभर प्रवास सुरू असतो.

महाराष्ट्राच्या या सदाबहार नानांना आणि यशस्वी साखर उद्योजकाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
नानांना २७ जुलै रोजी सकाळी पंतप्रधानांचा फोन आला आणि महाराष्ट्राबाहेर काम करण्यासाठी तयार राहा, असा निरोप देत त्यांच्याशी विविध विषयावर काही मिनिटे गप्पा मारल्या. केंद्र सरकारने त्याच दिवशी रात्री उशिरा काही राज्यपालांच्या नावाची घोषणा केली. नाना म्हणाले, ‘माझा यावर विश्वासच बसत नव्हता. मात्र मी पक्षाचे काम गेल्या ४४ वर्षांपासून करत आहे. भाजपची स्थापना होण्याआधी जनसंघाचे काम करत होते. १९६७ पासून राजकारणाशी जोडलो गेलेलो आहे. त्याचेच हे फळ आहे. पक्षाचे आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो.