साखर उत्पादन ३४९ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली: देशात उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने, आगामी हंगाम २०२५-२६ मध्ये साखर उत्पादन १८ टक्क्यांनी वाढून ३४९ लाख टन होऊ शकते, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या खासगी साखर उद्योगाच्या शिखर संस्थेने व्यक्त केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हंगामात २९५ लाख साखर उत्पादन झाले, त्या आधीच्या हंगामात ते ३२० लाख टन झाले होते.

महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र ८ टक्क्याने वाढून १४.९३ लाख हेक्टर झाले आहे, जे गेल्या वर्षी १३.८२ लाख हेक्टर होते. अनुकूल पाऊस, मे महिन्यात चांगला पाऊस आणि जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा यामुळे उसाची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. यामुळे, राज्यातील साखर उत्पादन गत हंगामाच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे,

सप्टेंबरमध्ये दुसरा अंदाज

सध्याचे अंदाज प्राथमिक आहेत, कारण मान्सून अद्याप सुरू आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुन्हा पीक परिस्थितीचा आढावा घेईल आणि सप्टेंबर २०२५ मध्ये दुसरा अंदाज अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे इस्माने म्हटले आहे.

जुलैअखेर साखर उत्पादन २५८ लाख टन

देशात साखरेचा मुख्य हंगाम संपला असला, तरी कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातून विशेष हंगामास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार जुलैअखेर देशातील साखर उत्पादन २५८.२० लाख टन झाले आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या ३१६ लाख टनांपेक्षा १८.३८ टक्क्यांनी कमी आहे.

जुलैअखेरपर्यंत कर्नाटकातील सात आणि तमिळनाडूतील नऊ कारखाने सप्टेंबरअखेर सुरू राहिल्याने देशातील साखर उत्पादन २६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हा अंदाज २०२४-२५ या वर्षात राज्यनिहाय साखर कारखान्यांत झालेल्या उस गाळप अहवालाच्या आधारे काढण्यात आला आहे.

साखर उत्पादनात होणारी अपेक्षित वाढ आणि लोकांमध्ये वाढणारी आरोग्यविषयक जागरूकता यामुळे दरडोई साखरेच्या वापरात घट होण्याची शक्यता लक्षात घेता, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने यात धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. त्या अनुसार सुधारित एफआरपीनुसार सर्व फीडस्टॉकसाठी इथेनॉल खरेदीच्या किमतीत सुधारणा करण्यात यावी, वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी व साखर निर्यातीला परवानगी द्यावी, असे सुचविले आहे.

२०२४-२५ मध्ये ५३४ साखर कारखाने सुरू होते. मुख्य हंगाम संपल्यानंतरही देशात १६ कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १२ कारखाने सुरू होते. यंदा उसाची लागवड जादा असल्याने कर्नाटकात ७ कारखाने मुख्य हंगामानंतर सुरू झाले. तर तमिळनाडूत ९ कारखाने सुरू आहेत. सध्या ५३४ पैकी ५१८ कारखाने बंद आहेत. जुलैअखेर २ हजार ७७७ लाख टन गाळप झाले. यातून ९.३० टक्के रिकव्हरीने २५८ लाख टन साखर तयार झाली. मुख्य हंगाम संपल्यानंतर काही महिन्यानंतर कर्नाटक व तमिळनाडूत विशेष हंगामाला सुरुवात झाली आहे. हा हंगाम आणखी दोन महिने चालण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारताने निर्धारित कालावधीपेक्षा पाच वर्षे अगोदरच साध्य केल्याबाबत समाधान व्यक्त केले. सध्या एकूण ११२६ कोटी लिटर झालेल्या इथेनॉल वाटपाच्या तुलनेत फक्त ३८ टक्के पुरवठा साखर-आधारित फीडस्टॉकमधून झाला आहे, तर ६२ टक्के धान्य-आधारित स्रोतांमधून आला आहे. हा बदल अधिक फीडस्टॉक विविधीकरण दर्शवितो पण भविष्यातील धोरणांबाबतचे प्रश्नही उपस्थित करत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »