‘जकराया’ला ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत निर्मितीत यश

सोलापूर : जकराया साखर कारखान्याने (ता. मोहोळ )ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या खाताची निर्मिती येत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.
केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन या उत्पादनाला देशातच मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पथदर्शी निर्णय घेतले आहेत. इथेनॉलच्या विक्रीतून येणारा पैसा कारखान्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. याचा फायदा कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांनाही होणार आहे. देशांतर्गत इथेनॉलच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन परदेशातून पेट्रोलची आयात कमी करण्याचे शासनाचे धोरण आहे. रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होऊन जमिनी नापिकी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपायांची गरज आहे. आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात पोटॅश आयात करावे लागते. पोटॅशची आयात कमी करून पीडीएम पोटॅश निर्मितीचा कार्यक्रम केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर राबवायचा आहे. आम्ही त्यानुसार काम करतो आहोत, असे जाधव म्हणाले.
जकरायाचा हा पथदर्शी प्रकल्प असून हा प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या विपणन विभागाचे मुख्य व्यवस्थापक विलास पाटील, पुणे परिमंडळ मुख्य व्यवस्थापक दीपक कुंजीर, सोलापूरचे व्यवस्थापक कैलास घोलप, कृभकोचे व्यवस्थापक आशिष उमप यांनी कारखान्याच्या या प्रकल्पाला भेट दिली. त्यांच्या देशभरातील वितरण यंत्रणेमार्फत जकराया शुगरने उत्पादित केलेले हे खत देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, रफिक पाटील, चंद्रकांत सरवळे, भानुदास गावडे, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, चीफ इंजिनिअर कुबेरदास कलुबर्मे, चीफ अकौंटंट बजरंग जाधव आदी उपस्थित होते…