जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात उपोषण करणार : कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ
नगर : जिल्ह्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.
कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक निवृत्ती कारभारी बनकर व सौ मंदाताई बनकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी कोल्हे बोलत होते.
समन्यायी पाणी वाटप कायदा व मेंढेंगिरी समितीच्या अन्यायकारक अहवालामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर व नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी कमी झाले आहे. यंदा नगर-नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना या दोन्ही जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणात साडेआठ टीएमसी पाणी सोडल्यास या भागातील शेती व कारखानदारी उद्ध्वस्त होईल.
जायकवाडीला पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून, दरवर्षी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात व गोदावरी कालव्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आता एकजुटीने निकराची लढाई लढावी लागणार आहे. हक्काचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रथम लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी जाहीर करून पाण्यासाठीच्या लढ्याचे रणशिंग फुंकले.
हक्काच्या पाण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या उपोषणात शेतकरी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणांसह सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.