… तर २६ पासून बेमुदत संप : ऊसतोडणी, वाहतूक कामगारांचा इशारा

कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ पूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी दिला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत उभयतांनी पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘दर व मुकादमांचे कमिशन याविषयी २० ऑक्टोबर २०२० रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता. कराराची मुदत गत हंगामाबरोबरच संपली आहे. त्यामुळे आगामी तीन हंगामांसाठीचा नवीन त्रिपक्षीय करार करण्यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी, साखर संघाचे प्रतिनिधी आणि ऊस तोडणी व ओढणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समितीची बैठक २५ सप्टेंबरपूर्वी घ्यावी.’
नवीन करार करण्यासह विविध मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.