सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी -यशराज देसाई

सातारा – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम यशस्वी होईल, असे ते म्हणाले.
कारखान्याच्या यंत्रसामग्रीची देखभाल-दुरुस्ती वेगाने सुरू असून, गळीत हंगामाच्या प्रारंभाची पूर्वतयारी म्हणून आज चेअरमन यशराज दादा यांच्या शुभहस्ते मिल विभागातील रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, डॉ. दिलीपराव चव्हाण, पांडुरंग नलवडे, भागोजी शेळके, बळीराम साळुंखे, प्रशांत पाटील, सुनील पानस्कर, लक्ष्मण बोर्गे, सर्जेराव जाधव, शशिकांत निकम, बबनराव शिंदे, सोमनाथ खामकर, विजय सरगडे, दिपाली पाटील, जयश्री कवर, कार्यकारी संचालक एस. एल. देसाई तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवर्षी कारखान्याने 2,05,000 मे.टन ऊसाचे गाळप करून 11.71% सरासरी उताऱ्याने 2,40,040 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. याच परंपरेत पुढे जात, यंदा जास्तीत जास्त नोंद केलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यशराज देसाई म्हणाले, “स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे विचार आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्वप्न – शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे – सत्यात उतरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
“आपला कारखाना हा सभासदांचा हक्काचा असून, सर्वांनी जबाबदारीने आणि एकजुटीने काम केल्यास गळीत हंगाम निश्चितच यशस्वी होईल,” असे त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व बिगर उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यालाच देऊन हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन यशराज देसाई यांनी शेवटी केले.