ऊसउत्पादकांना मदत देण्याची गरज : शरद पवार

पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांमध्ये उसाबरोबर इतर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी ऊस पडला, तर काही ठिकाणी वाहून गेला आहे. राज्यातील पूरग्रस्त, ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र, ही मदत करण्यासाठी ऊसउत्पादकांच्याच बिलातून प्रतिटन १५ रुपये सक्तीने कपात करून वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार राज्य सरकारने करावा, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, अतिवृष्टीबाधित ठिकाणी किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याची गरज होती. १२ ऑक्टोबरला साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिल बैठक घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्याकडूनच पैसे घेऊ नये. राज्य सरकारने आमच्याकडे नुकसानीचा अंतिम प्रस्ताव दिलेला नाही असे केंद्राचे म्हणणे आहे. राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांशी बोलून निधीचे वाटप सुरू करावे.