ऑगस्टपासून धावणार १०० टक्के बायो इथेनॉलवरील वाहने

नवी दिल्ली : आता इंधन दरवाढीचे टेन्शन घेण्याचे कारण नाही किंवा डिझेल किंवा सीएनजीसारख्या महागड्या इंधनाची गरज भासणार नाही. येत्या आॅगस्ट महिन्यापासून रस्त्यावर इथेनॉलवर मोटारी धावणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, येत्या आॅगस्टमध्ये भारतातील रस्त्यावर इथेनॉलच्या गाड्या धावतील, अशी घोषणा केली.
मोदी सरकारच्या ९ वर्ष पूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबईमध्ये बोलताना गडकरींनी ही माहिती दिली.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी यांनी गेल्या नऊ वर्षातील देशातील विकास कामांचा आढावा घेतला. आॅगस्ट महिन्यांत इथेनॉलवर गाड्या धावतील, असे ते म्हणाले. मोटारच नाही तर दुचाकी वाहनेदेखील इथेनॉलवर येतील,असा विश्वासस त्यांनी व्यक्त केला. जपानची कंपनी टोयोटा इथेनॉलची पहिली गाडी लॉंच करत आहे. या गाड्या १०० टक्के बायो इथेनॉलवर चालणार आहेत. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे इंधन स्वस्त राहील. प्रदूषणदेखील असणार नाही, असेही गडकरी म्हणाले.