नववी शिकलेल्याला बनवले मुख्य शेती अधिकारी
नागवडे कारखान्याला साखर संचालकांची नोटीस
पुणे : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने नववी शिकलेल्या व्यक्तीस मुख्य शेती अधिकारी बनवल्याचा आरोप असून, यासंदर्भात साखर संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे.
नागवडे कारखाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांना वयोमर्यादा टळून गेल्यानंतरही मुदतवाढ देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने हा निर्णय बेकायदेशीर ठरवला. गेल्याच महिन्यात हा निकाल लागला आणि आता शेती अधिकारी नियुक्तीवरून कारखाना वादग्रस्त ठरला आहे.
हे प्रकरण ऑक्टोबर महिन्यातील असले, तरी कारखान्याने अद्याप खुलासा केला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
संचालकांनी नोटिशीत म्हटले आहे, की नागवडे सहकारी साखर कारखाना लि. श्रीगोंदा या कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व वय ६३ मध्ये कार्यरत असलेले कार्यकारी संचालक यांनी अधिकाराचा व पदाचा गैरवापर करुन इयत्ता ९ वी शिकलेल्या व्यक्तीस मुख्य शेतकी अधिकारी बनविलेले असल्याबाबत तक्रार मिळाली आहे.
कारखान्याचे संचालक मंडळ, चेअरमन व वय ६३ मध्ये नियमबाहय मुदतवाढीवर असलेले कार्यकारी संचालक यांनी इयत्ता नववी शिकलेलया व्यक्तीस मुख्य शेतकरी अधिकारी केले असल्याबाबत एका पत्रान्वये भाऊसाहेब पवार यांनी तक्रार केली आहे. सदर प्रकरणी साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी आयोजित करुन शेतकी अधिकारी यांच्या शिक्षणाचे व अनुभवाचे निकष तपासणेबाबत पत्रामध्ये नमूद केले आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर कारखान्याचे सभासद लवकरच साखर आयुक्तालयाबाहेर उपोषणास बसतील असेही नमूद केले आहे.
प्रस्तुत प्रकरणी या कार्यालयाच्या संदर्भीय पत्रान्वये श्री. भाऊसाहेब पवार यांच्या तक्रारीस अनुसरुन मागविलेला खुलासा अद्याप अप्राप्त आहे. याबाबत कळविण्यात येते की, सदर खुलासा तात्काळ प्रादेशिक सहसंचालक (साखर), अहमदनगर यांचे कार्यालयामार्फत सादर करावा. जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे या कार्यालयास शक्य होईल, अशी ताकीदही देण्यात आली होती.