पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला नुकतीच कोकाटे यांनी भेट दिली. याभेटीदरम्यान, कृषिमंत्र्यांबरोबर शेतकरी व शास्त्रज्ञांशी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कोकाटे बोलत होते.
यावेळी पुणे येथील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष कैलास भोसले, प्रगतशील शेतकरी दिलीपराव शिंदे, शेतकरी मधुकर कोकाटे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विद्यापीठ अभियंता इंजि. मिलिंद ढोके, ऊस विशेषज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, सरपंच राहुल कोकरे यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्री कोकाटे म्हणाले की, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला तब्बल ९४ वर्षे पूर्ण झाली. त्याच्या बळकटीकरणासाठी नवी इमारत, शेतकरी निवास व प्रशिक्षण केंद्र, कर्मचारी निवासस्थान, टिशू कल्चर प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्षेत्र कार्यालय उभारणीसाठी तत्वतः मान्यता देत असल्याचे जाहीर करून ते म्हणाले की, केंद्राने उसाचे अनेक वाण दिले. यापुढे कमी कालावधीचे व अधिक साखर उतारा देणारे वाण विकसित करावे. ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लागवड खर्च कसा कमी करता येईल व उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी इंजि. मिलिंद डोके यांनी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील प्रस्तावित इमारतींचा आराखडा सादर केला. ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
एआयच्या मदतीने जनजागृती
शासनाचे नवीन कृषी धोरण, नवीन वाण शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपण गावपातळीवर डिस्प्ले बोर्ड लावून प्रचार व प्रसार करणार आहे. जेणेकरून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आपण शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने जनजागृती करणार असल्याचे मंत्री कोकाटे म्हणाले.