…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा
अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने वैधानिक, नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. याप्रश्नी शासनाने त्वरित पावले उचलून ‘जरंडेश्वर’वर कारवाई करण्यात यावी. तसेच जरंडेश्वर शुगर मिलने तिळगंगा नदीत सोडलेले हे रासायनिक पाणी त्वरित थांबवावे. अन्यथा आपण ‘जरंडेश्वर’विरोधात तीव्र जनआंदोलन करणार असल्याचे कुमठे गावचे सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले. कुमठे ग्रामपंचायतीची मासिक सभा नुकतीच झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेत जरंडेश्वर शुगर मिलने आपले मळीमिश्रित पाणी आणि डिस्टिलरी प्रकल्पातील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडू नये, असे पत्र शुगर मिलला देण्याचा ठराव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष चव्हाण होते.
या सभेत ग्रामस्थ शामराव चव्हाण यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या अर्जाचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी भरत जाधव यांनी केले. त्यात म्हटले होते, की कुमठे गावालगत वाहत जाणाऱ्या तिळगंगा नदीत जरंडेश्वर शुगर मिलचे मळीयुक्त पाणी आणि जरंडेश्वर शुगर मिलच्याच डिस्टिलरीमधील टाकाऊ रासायनिक पाणी हे सोडले जात आहे. पुढे हे पाणी तिळगंगा नदीच्याकाठी असलेल्या कुमठे गावच्या सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरींमध्ये उतरत आहे. त्यामुळे विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. तेव्हा जरंडेश्वर शुगर मिलचे हे मळीयुक्त व रासायनिक पाणी नदीपात्रात येणे बंद करावे. या अर्जाला सदस्य संभाजी चव्हाण हे सूचक, तर अविनाश जगदाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
अर्जाच्या मंजुरीनुसार तिळगंगा नदीत मळीमिश्रित पाणी सोडू नये, असे पत्र ग्रामपंचायतीने जरंडेश्वर शुगर मिलला द्यावे, असा ठराव करण्यात आला. या सभेस सदस्य शिवाजी रोमन, महंमद मणेर, सुजाता जगदाळे, महेश पांडुरंग जगदाळे, मीना जगदाळे, अर्चना वाघ, प्रकाश तांबे, मनीषा रोमन उपस्थित होत्या.