मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करा ; उत्पादन वाढीसाठी लागेल ती मदत करणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 राजगड कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादकांना संग्राम थोपटे यांचे आश्वासन

भोर : राजगड सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्याचे आवाहन  कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी  केले आहे. अनंतराव थोपटे महाविद्यालयातील हॉलमध्ये आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, आणि सभासद संवाद बैठकीत त्यांनी हे आवाहन केले आहे. चांगले आणि भरघोस उत्पादन घेण्यासाठी लागेल ती मदत पुरवविण्यात येईल. ऊस दराबाबत राजगड इतर कारखान्यांच्या पुढेच राहून दर देईल, असे आश्वासनही संग्राम थोपटे यांनी दिले आहे. या वेळी कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, प्रभारी कार्यकारी संचालक आव्हाड, माजी संचालक विठ्ठल कुडले, प्रगतिशील शेतकरी संपत थोपटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील गाळप हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी ऊस लागवड महत्त्वाचे असल्याचे सांगून संग्राम थोपटे म्हणाले की,  उसाची माहिती, बी-बियाणे, लागणारी खते, आधुनिक तंत्रज्ञान या सर्व बाबींची माहिती देऊन उस उत्पादक शेतकरी बांधवांना शेताच्या बांधावर लागेल ती मदत पुरवण्याचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.

४६७ कोटीच्या कर्जहमीबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राजगड सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या ४६७ कोटी रुपये कर्जहमीबद्दल संग्राम थोपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नवीन कारखान्याच्या निर्मितीमुळे प्रति दिन ३५०० मेट्रिक टन गाळप क्षमता, ६० के. एलपीडी डिस्टिलरी प्रकल्प, १२ मेगावॅट वीजनिर्मिती, ५ टन सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्यामुळे इतर कारखान्यांच्या पेक्षा आगाऊ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देता येणे शक्य होणार असल्याचेही थोपटे म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »