एकरकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवशेनातच करा : राजू शेट्टी

‘स्वाभिमानी’चे ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन
पुणे : सर्व साखर कारखान्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम एकरकमी देणे बंधनकारक करणारा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. येत्या हिवाळी अधिवशेनातच हा कायदा आणावा आणि याच विधिमंडळ अधिवेशनात तो मंजूर करावा, यासाठी ते आग्रही आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कारखान्यांकडून शोषण असल्याचा आरोप करून, त्याचा निषेध म्हणून ‘स्वाभिमानी’ने महाराष्ट्रात दोन दिवसीय (१७, १८ नोव्हेंबर) ऊसतोड आणि वाहतूक बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानिमित्त ते ‘शुगरटुडे’शी बोलत होते.
आपली मागणी रास्त आहे, त्याच्या समर्थनार्थ सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊसतोड दोन दिवस बंद ठेवून संघटनेने केलेल्या आवाहनाचे समर्थन करावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
ते म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस आंदोलन सुरू केले आहे. आमचा विरोध विशेषत: कोल्हापूर आणि सांगलीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे आम्ही राज्य सरकारचे लक्ष वेधत आहोत. सरकारने दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाईल हे सरकारने लक्षात ठेवावे.”
मागच्या महाविकास आघाडी सरकारने एफआरपी दोन हप्त्यात देण्यात अनुमती देऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नवे सरकार आल्यानंतर हा निर्णय बदलला जाईल, अशी आमची अपेक्षा होती. मात्र या सरकारने याबाबत अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.
“साखर कारखाने आता साखर उत्पादनावर अधिक अवलंबून नाहीत. ते इथेनॉल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाचा वापर करत आहेत आणि इथेनॉल जास्त परतावा देत आहे. त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी मागणीही माजी खासदार शेट्टी यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात ऊसतोड बंद आंदोलनाला कारखानदारांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन संघटनेने केले आहे. या आंदोलनातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन दिवसांमध्ये कारखाने सुरु ठेवले तर संघर्ष होईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एका शेतात कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडल्याची माहिती आहे. मराठवाड्यातही ‘स्वाभिमानी’ कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हे आंदोलन सविनय कायदेभंग पद्धतीने करावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
राहुरी येथून मिळालेल्या माहितीनुसार, वांबोरी येथे प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून, कार्यकर्त्यांनी अर्धा तास कारखाना बंद पाडला. राहुरी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
कारखान्याचे सुरक्षारक्षक व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत उड्या मारल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करून, आंदोलकांना गव्हाणीतून बाहेर काढले.
कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत. एकरकमी एफआरपी द्यावी. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि यंदाच्या वर्षी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. अशा स्वाभिमानीच्या प्रमुख मागण्या आहेत.