आ. रोहित पवार यांची ‘ईडी’कडून दुसऱ्यांदा आठ तास चौकशी

मुंबई : बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुसऱ्यांदा आठ तास चौकशी केली. बारामती ॲग्रोला खेळते भागभांडवल दिलेल्या कर्जाच्या रकमेचा उपयोग कन्नड सहकारी साखर कारखाना घेण्यासाठी केल्याचा आरोप आ. पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चौकशीनंतर ‘ईडी’च्या कार्यालयातून बाहेर पडताना, रोहित पवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. आपण कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही, असे ठामपणे सांगताना, ‘ही विचारधारेची लढाई आहे आणि मी ती लढणारच. कुणालाही घाबरणार नाही’, असे प्रतिपादन केले.
या प्रकरणात गेल्या 10 दिवसांत ईडीसमोर हजर होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांची यापूर्वी 24 जानेवारी रोजी ‘ईडी’ने चौकशी केली होती.
गुरुवारी ते दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दुपारी 1.05 वाजता पोहोचले आणि रात्री 9 नंतर तेथून ते इमारतीतून बाहेर पडले. ते बाहेर येताच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित होत्या
प्रश्नोत्तरानंतर समर्थकांना संबोधित करताना, रोहित पवार म्हणाले की त्यांना एजन्सीने काही कागदपत्रे सादर करण्यासाठी बोलावले होते आणि गरज पडल्यास त्यांची पुन्हा चौकशी केली जाईल असे सांगितले होते.
“राजकारणात येण्यापूर्वी मी व्यवसायात होतो. मी काही चुकीचे केलेले नाही. सरकारमध्ये असलेल्यांना हे कळायला हवे की मी घाबरलो नाही. जे घाबरले ते पळून गेले,” असे रोहित पवार त्यांचे काका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल खोचकपणे म्हणाले.
आमदार पवार म्हणाले की, त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 25,000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मुंबई पोलिसांनी शहर न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टची माहिती मागितली आहे. या कथित घोटाळ्याची EOW ने स्वतंत्रपणे चौकशी केली होती.
“ज्या प्रकरणाची चौकशी करून ‘ईओडब्ल्यू’ने ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला आहे, त्यासाठी आता माझी चौकशी केली जात आहे, ’’ अशी टीकाही त्यांनी केली.
“खरे मराठी लोक” संघर्षाला घाबरत नाहीत आणि मी गेल्या वर्षी काढलेल्या 800 कि. मी. राज्यव्यापी ‘युवा संघर्ष यात्रे’मध्ये लाखो तरुण माझ्यासोबत चालले होते.’’, असे ते म्हणाले.
राज्यभरातून आलेले पक्षाचे शेकडो कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात तसेच ईडीच्या आस्थापनेजवळ जमले आणि त्यांनी ‘ईडी’च्या विरोधात निदर्शने केली. पुण्यासह राज्यातही विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
ईडीने 5 जानेवारी रोजी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो या कंपनीच्या आवारात आणि बारामती शहर, पुणे शहर, छत्रपती संभाजीनगर आणि राज्यातील इतर काही ठिकाणी संबंधित संस्थांची झडती घेतली.
महाराष्ट्रातील अनेक आर्थिक अडचणीत सापडलेले सहकारी साखर कारखाने खासगी कंपन्यांना विकल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ‘ईडी’ आणि ‘ईओडब्ल्यू’ने गुन्हे दाखल केले होते.