कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच : आ. रोहित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : कन्नड कारखान्याचा व्यवहार पारदर्शकच आहे. वेळप्रसंगी आपण न्यायालयात लढू, परंतु हा कारखाना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी शेतकरी सभासदांना दिली. कन्नड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकलेला नाही. मी त्यांच्याकडे येत नाही, त्यांचे ऐकत नाही म्हणून जाणीवपूर्वक ईडीची कारवाई करून दबाव आणला जात आहे. पण मला कितीही दम दिला तरी मी वाकणार नाही, असे पवार म्हणाले.

आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो समूहातील कन्नड येथील कारखान्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आ. पवार यांनी थेट कारखान्यावर येऊन पिकअप गाडीच्या टपावर उभे राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, कन्नड साखर कारखाना हा कर्जात बुडाला होता. विक्रीसाठी दोनदा टेंडर निघाले तरी घेण्यासाठी कुणीही समोर आले नाही. हा कारखाना ३५ कोटींत विकला जाणार होता. आम्ही ५० कोटींत घेऊन व्यवस्थित सुरळीत चालू ठेवला. हा कारखाना कुणीही बंद करून शकत नाही. इंडीच्या जप्तीचे कोणतेही पत्र अद्याप आम्हाला मिळालेले नाही. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन लढू. मात्र, हा कारखाना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शेतकरी, कामगारांनी घाबरू नये. लवकरच तुमचे कष्टाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील, असे पवार म्हणाले. यावेळी माजी आमदार किशोर पाटील, पांडुरंग तायडे, बाबासाहेब मोहिते, प्रसन्ना पाटील, सिद्धेश्वर झाल्टे, बापू गवळी आदींसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »