शिरोळमध्ये शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करावा आणि मागच्या हंगामातील उसाला ३७०० रु. दर देऊन, बाकी रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी इ. मागण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, दीपक काळे, संभाजी माने, महादेव काळे, एकनाथ माने, महेश जाधव, नवजित पाटील, संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
साखर कारखाने उसाला परवाडणारा दर जाहीर न करताच सुरु केले आहेत. शेतकरी या दरात ऊस शेती परवडत नाही म्हणून कारखान्यांना ऊस द्यायच्या विचारात नाही तरीही कारखाने बाहेरून ऊस आणून आणि पोलीस बळ वापरून कारखाना सुरु ठेवायचा प्रयत्न करत आहेत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
या दरात आपलं भागत नाही म्हणून शेतकरी कारखाना बंद करा म्हणून रस्त्यावर येत असताना पण कारखाने दडपशाही करून शेतकऱ्यांना चिडीला पाडत आहेत आणि त्यामुळे कायदा सुव्यस्था बिघडत चालली आहे. आम्ही कारखान्यांना लेखी पत्राने दर मागणी करून विनंती केली पण ते शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे आम्हाला आता आंदोलन उपोषण याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे…
1) मागील हंगामात तुटलेल्या उसास 200 आणि चालूला 3700 जाहीर करावेत.
2) कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पहिला तोडण्यासाठी सर्व टोळ्या वं मशीन कार्यक्षेत्रात लावून हा ऊस संपवावा व त्यानंतर गेटकेन किंवा बाहेरील ऊस आणावा.
3) क्रमपाळी नुसार कार्यक्षेत्रातील ऊस तोड कार्यक्रम तयार करून त्यानुसार 80% लावण व 20% खोडवा तोड करणार म्हणून कारखान्यांनी आपला प्रोग्राम सार्वजनिक करावा.
4) ऊस तोड मजूर आणि वाहतूकदार यांनी इंट्री खुशाली घेऊ नये म्हणून कारखान्यांनी परिपत्रक काढून मागितल्यास बिलातुन वसुली करून घेऊ अशी नोटीस सर्व वाहतूकदार मुकादम यांना काढावी.
या वरील चार मुद्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत शिरोळातून कोणत्याही कारखान्याची वाहतूक करून दिली जाणार नाही.
या मागण्यांबाबत तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे.