‘श्री विघ्नहर’ला प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर
चेअरमन सत्यशिल शेरकर यांची माहिती
पुणे – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासद, ऊस उत्पादकांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम २०२३-२४ करीता नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा उच्च साखर उतारा विभागातील प्रथम क्रमांकांचा उत्कृष्ठ ऊस विकास हा पुरस्कार जाहिर झाला असल्याची माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली.
चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने साखर कारखानदारी संबंधीत विविध संस्थांचे आत्तापर्यन्त ६३ पुरस्कार मिळविलेले असून यंदाच्या मिळालेल्या या पुरस्काराने विघ्नहरला मिळालेल्या एकूण पुरस्कारांची संख्या ६४ झाली असल्याचे ते म्हणाले. विघ्नहरने २०२३-२४ चे गळीत हंगामात १० लाख २३ हजार ४२५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून ११ लाख ५० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तर ११.६३ % साखर उतारा राखण्यात यश मिळविले आहे. तसेच सहवीज निर्मीती प्रकल्पातून ४ कोटी १२ लाख ६३ हजार २०० युनिट वीज निर्यात केली. कारखान्याचा विस्तारीत डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून डिस्टीलरी प्रकल्पातून ९५ लाख १७ हजार ८३९ लिटर अल्कोहोलची व ७० लाख ७९ हजार ७५८ लिटर इथेनॉल निर्माती झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, हंगाम २०२५-२०२६ साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याकरीता लागवड हंगाम २०२४-२०२५ मध्ये ऊस लागवडीचे धोरण १ जून-२०२४ पासून सुरु असून विघ्नहर कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात असल्याचे ते म्हणाले. या अभियानांतंगत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उधारी तत्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जात आहे. ऊस लागवड व कारखान्याकडे ऊसाची नोंद झालेनंतर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष ऊस उत्पादकांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होणेसाठी कारखाना खर्चाने व्हीएसआय आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादकांमध्ये प्रति एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्याची भावना वृध्दींगत होण्याकरीता प्रति एकरी १०० ते ११० मे. टन ऊस उत्पादन घेणारे ऊस उत्पादक शेतकरी तसेच प्रतिएकरी १११ मे.टन त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कारखान्याचे आज अखेर ६,२०,०९० मे. टन इतके गाळप झालेले असून सहवीज निर्मिती २.३१.६९,००० युनिट झालेली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातून ५५,६८,९६५ लिटर अल्कोहोल निर्मिती झालेली आहे. चालू गळीत हंगामा मध्ये कारखान्याचे १०,००,००० मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
तसेच सन २०२४-२५ मध्ये कारखान्याचे ७५०० टी.सी.डी चे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून मील व बॉयलर विभागाचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच बॉयलिंग हाऊसचे काम लवकरच पूर्ण करुन चालू गळीत हंगामा मध्ये यशस्वी रित्या चाचणी पूर्ण होईल. तसेच सन २०२५-२६ मध्ये कारखान्याचे गळीत प्रतिदिन ८००० ते ८५०० मे. टन क्षमतेने होईल असे त्यांनी सांगितले.