कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी उसाच्या लागवडी फारशा झाल्या नसल्याने या भागातील हंगाम लवकर संपला होता. दरम्यान, हा विशेष हंगाम मुख्य हंगामाआधी सुरू झाल्यास एकूण उत्पादनात चार ते पाच लाख टन साखरेची वाढ होऊ शकते. तसेच उसाची चांगली वाढ झाल्याने ऊस उत्पादक राज्यामधील उसाची रिकव्हरीही वाढेल, अशी अपेक्षा ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.
पुढील साखर हंगाम आशादायी ठरणार
पुढील हंगाम (२०२५-२६) उद्योगासाठी दिलासा देणारा ठरेल. देशाचा यंदाचा साखर हंगाम कमी उत्पादनाचा गेला असला तरी ऊस लागवडीत वाढ झाल्याने पुढील हंगामात मात्र पुरेशा साखर उत्पादनाचीही अपेक्षा ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे. यंदाचा सरता हंगाम साखर उद्योगाच्या दृष्टीने कठीण गेला. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात घट तर झालीच ; शिवाय उत्पादन घटल्याने साखर कारखानेही पुरेशा क्षमतेने सुरू राहू शकले नाहीत. यामुळे अनेक कारखान्यांना अपेक्षित साखर उत्पादन करता आले नाही. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने उसाच्या लागवडी वाढल्या आहेत. हवामान खात्यानेही दमदार मॉन्सूनची शक्यता व्यक्त केल्याने यंदा उसाची वाढ चांगली होईल, अशी शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम पुढील हंगामावर होणार आहे.
आगामी हंगाम वेळेतच सुरू होणार
सध्याच्या प्राथमिक अंदाजानुसार येणारा हंगाम ऑक्टोबरला म्हणजे वेळेतच सुरू होईल, अशी शक्यता ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या आघाडीच्या राज्यांमध्ये पुढील वर्षासाठी लागवडी वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागासह अन्य संस्थांनी येणारा पावसाळी हंगाम सामान्य असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे सध्या वाढीच्या अवस्थेतील उसाला पावसाळ्यात चांगले पाणी मिळेल व त्याचा अनुकूल परिणाम उसाच्या वाढीवर होऊ शकतो, असे ‘इस्मा’च्या सूत्रांनी सांगितले.
यूपीतील २० कारखाने वगळता अन्य राज्यांतील गळीत हंगाम संपला
उत्तर प्रदेशातील वीस साखर कारखाने वगळता अन्य राज्यांतील गळीत हंगाम पूर्णपणे संपला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे साखर सुमारे ६० लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. सध्याचे गाळप पाहता तो खराही ठरत आहे.