साखरेच्या एमएसपीत वाढ करणार : केंद्राचे आश्वासन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : २०१९ पासून प्रलंबित असलेल्या, साखरेच्या न्यूनतम विक्री किमतीत (एमएसपी) आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी साखर उद्योगाला दिले आहे.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, कार्यकारी मंडळ सदस्य व रेणुका शुगर्सचे संचालक रवी गुप्ता, कार्यकारी संचालक अजित चौगुले आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी नवी दिल्ली येथे जोशी यांची २८ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन साखर उद्योगासमोरील अडचणींची माहिती दिली. साखरेची एमएसपी आणि इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याची किती गरज आहे हे या शिष्टमंडळाने पटवून दिले.

भारत सरकारने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी साखरेची एमएसपी ३१ रुपये प्रति किलो निश्चित केली आहे. ऊस दराची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) गेल्या पाच वर्षामध्ये रुपये २७५० वरुन ३४०० रुपये प्रति टन वाढ केली आहे. साखरेची एमएसपी मात्र स्थिर ठेवली आहे. या काळात साखर उत्पादन खर्च प्रति किलो ४१.६६ रूपयांपर्यंत वाढला आहे. परिणामी साखर उदयोगाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे, असे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

इथेनॉल पुरवठा वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील एकूण इथेनॉल पुरवठ्याच्या ७३ टक्के पुरवठा एकट्या साखर उदयोगाने केला आहे, हे नमूद करताना, वर्ष २०२३-२४ मध्ये इथेनॉल उत्पादनाबाबत साखर कारखान्यांवर केंद्राने निर्बंध घातल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. केंद्र सरकारने हंगाम २०२३-२४ ऊस दराची एफआरपी किंमत रुपये ३१५ वरुन हगांम २०२४-२५ करिता (ऑक्टोबर ते सप्टेंबर) ३४० केली आहे. त्यामुळे तसेच प्रक्रिया खर्चामध्ये वाढ झाल्याने इथेनॉल उत्पादन खर्चदेखील वाढला आहे. इथेनॉल आणि साखर हे कारखान्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख घटक आहेत, मात्र दोन्ही बाबतीत साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, १५ नोव्हेंबरपासूनचा आगामी हंगाम सुरू करणे कठीण होऊन बसले आहे, याकडे मंत्री जोशी यांचे लक्ष वेधण्यात आले.

या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ७ रूपये आणि इथेनॉल खरेदी दरामध्ये प्रति लिटर ५ रूपये वाढ करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने मंत्र्यांकडे केली. त्यानंतर जोशी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीस शिफारस करून दोन्ही दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले. ही माहिती ‘विस्मा’ने एका निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »