साखर उत्पादन २७.६८ लाख मेट्रिक टनांनी घटले

पुणे : राज्यात सध्या केवळ ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. यावर्षी २७.६८ लाख मेट्रिक टनांनी साखर उत्पादन घटले असून. ८०.०६ लाख मे. टन उत्पादन तयार झाल्याचे २७ मार्चच्या ऊस गाळप हंगामाच्या प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने साखर आयुक्तालयासह विविध संस्थांचाही ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा अंदाज वारंवार चुकल्याचे समोर येत आहे.
अहवालानुसार, एकूण २०० पैकी १८९ कारखान्यांची धुराडी ऊस संपल्याने बंद झाली आहेत. गतवर्षी याच दिवशी साखरेचे १०७.७४ लाख मे. टन झालेले साखर उत्पादन पाहता राज्यात चालू वर्ष २०२४-२५ मध्ये ९०४ ते १०१३ लाख मेट्रिक टनइतके ऊस गाळप होण्याचा साखर आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज होता. मंत्री समितीच्या बैठकीतही त्यावर अहवाल सादर करण्यात आला होता. तसेच इथेनॉलकडे सुमारे १० लाख टन साखर जाऊन साखरेचे ९२ते १०४ लाख मेट्रिक टनइतके उत्पादन हाती येण्याची अपेक्षा होती, साखर उतारा १०.२३ टक्क्यांइतका मिळणे गृहित धरण्यात आले होते.
२७ मार्चच्या अहवालानुसार ८४६ लाख ६ हजार टनइतके उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ९.४६ टक्के सरासरी साखर उताऱ्यानुसार सद्यः स्थितीत ८०.०६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन हाती आले आहे. यापूर्वीच्या म्हणजे हंगाम २०२३-२४ या वर्षात याच दिवशी १०५४.१५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले होते. तर १०.२२ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १०७.७४ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन हाती आले होते. याचा विचार करता सुरुवातीचा अंदाज आणि गतवर्षापेक्षाही ऊस गाळप कमी होऊन साखर उत्पादनातही मोठी घट झालेली आहे. त्यामुळे एकूणच ऊस गाळपाचा अचूक अंदाज वारंवार चुकत असल्याचे समोर येत आहे.
मिटकॉन संस्थेचाही अंदाज चुकला
साखर आयुक्तालयाने मिटकॉन या संस्थेबरोबर अचूक ऊस गाळप व साखर उत्पादन अंदाजासाठी सामंजस्य करार केला होता. त्यांच्या अंदाजानुसार, हंगाम -२०२४-२५ साठी १३.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्धता होती. एकूण ऊस गाळप १ हजार २३५ लाख मेट्रिक टन अपेक्षित धरले, तरी १० टक्के ऊस बेणं, चारा, रसवंती, गूळ-खांडसरीसाठी जाऊनही १ हजार १३ लाख मेट्रिक टन, त्यात १० लाख मे. टन साखर इथेनॉलसाठी वापरली गेली तरी १०३ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन हाती येईल, असा मिटकॉनचा अंदाज होता. पंरतु त्यांचाही अंदाज चुकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.