साखर उत्पादनात आतापर्यंत १७ लाख २० हजार टनांची वाढ

पुणे : राज्यात १९० साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३७९ लाख टन उसाचे गाळप करून सरासरी ८. २५ टक्के उताऱ्यासह ३१ लाख ३० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पादनात १६ लाख ८० हजार टनांची वाढ नोंद झाल्याची माहिती नुकतीच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना दिली आहे. यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी एकूण ७७ लाख ९० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४७३ कारखान्यांनी ६० लाख ७० हजार टन साखर उत्पादन केले होते. यंदा साखर उत्पादनात १७ लाख २० हजार टनांची वाढ झाली. उसाच्या गाळपातही १८३.७५ लाख टन वाढ झाल्याची माहिती महासंघाने दिली आहे.
यंदाच्या साखर हंगामामुळे साखरेच्या किमान विक्री दर स्थिर राहण्यासाठी केंद्राने साखर निर्यातीच्या कोट्यात आणखी वाढ करावी. यंदा इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे ३५ लाख टन साखर वळविण्यात येणार आहे. त्यात आणखी पाच लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.






