… तर आगामी गळीत हंगाम बंद, विराट मोर्चाद्वारे साखर कामगारांचा इशारा

पुणे : वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ७ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात हजारो साखर कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी ऊस गळीत हंगामच बंद ठेवू, असा गंभीर इशारा या मोर्चेकरी कामगारांच्या सभेत देण्यात आला.
साखर आणि जोडधंद्यातील कामगारांचे वेतन आणि सेवाशर्ती ठरविणेबाबत सरकारने ताबडतोड त्रिपक्षीय समिती गठीत करावी व वेतनवाढीचा निर्णय घ्यावा. त्रिपक्षीय समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत साखर आणि जोडधंद्यातील कामगारांना पाच हजार अंतरिम वाढ देण्यात यावी, साखर आणि जोडधंद्यातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे. साखर व जोडधंद्यातील रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक व तात्पुरत्या काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्यांकडे मोर्चातून लक्ष वेधण्यात आले.
भाडेपट्टयावर, सहभागीदारी तत्वाने आणि विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम व्यवस्थापनाकडून अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. थकीत वेतनासाठी साखर पोत्यांवर टॅगिंग करण्यात यावी.
याबाबत स्थानिक संघटनेची मान्यता घेऊनच करार करावा, बंद आजारी साखर कारखाने चालू करण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे किंवा भाडेपट्टयाने चालविण्यास द्यावे. या सर्व कारखान्यातील थकीत पगार लवकरात लवकर देऊन ‘पेमेंट ऑफ वेजेस’ कायद्यानुसार दरमहा 10 तारखेच्या आत पगार अदा करणेबाबत सर्व कारखान्यांना सरकार व साखर आयुक्त यांच्यामार्फत कळवावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
त्यांना गाळप परवाना नको
ज्या कारखान्यातील कामगारांचे पगार थकविले जातात किंवा थकले आहेत, अशा कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये. साखर व जोडधंद्यातील कामगारांना दरमहा 9 हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन साखर संचालक राजेश सुरवसे यांनी स्वीकारून तुमच्या मागण्याचे निवेदन सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुंडे, कार्याध्यक्ष शिवाजी औटी, सरचिटणीस सुभाष काकुस्ते, सरचिटणीस आनंदराव वायकर, कोषाध्यक्ष शिवाजी कोठवळ, भाऊसाहेब बांदल यांच्यासह साखर कामगार मोर्चात सहभागी झाले होते.
साखर कामगार नवीन वेतन वाढ सेवाशर्ती, यासाठी त्रिपक्षीय समिती गठीत करून वेतन मंडळांनी आचारसंहितेच्या आधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा भाजप आणि महायुतीच्या आमदारांच्या विरोधात आम्ही लढा देऊ आणि 2024 चा साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद ठेवू, असा इशारा सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी दिला.