ऐंशीवर कारखान्यांचे गाळप परवाने लटकले

पुणे : २०२३-२४ चा गाळप हंगाम १ नोव्हेंरपासून जोरात सुरू झाला असला, तरी तब्बल ८५ कारखान्यांचे गाळप परवाने विविध कारणांमुळे लटकले आहेत. यात सहकारी कारखान्यांसह खासगींचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामासाठी एकूण २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले होते, मात्र अटी-शर्तींच्या पूर्ततेअभावी ऐंशीवर कारखान्यांना ९ नोव्हेंबरअखेर गाळप परवाने मिळू शकले नव्हते. ५ नोव्हेंबरपर्यंत १२० कारखान्यांना परवाने मिळाले, त्यानंतरच्या कालावधीत ३२ कारखान्यांच्या अर्जांवर कार्यवाही सुरू होती. १२ कारखान्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.
मुख्यमंत्री साह्यता निधी आणि स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची देय रक्कम न देणे हे परवाने लटकण्यामागचे प्रमुख कारण असल्याचे समजते. यंदाच्या हंगामात एकूण १९० साखर कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. मागच्या हंगामात २१० कारखाने सुरू होते. एफआरपीची संपूर्ण रक्कम चुकती करणे, सरकारी देणी शंभर टक्के जमा करणे, वजनकाट्यांचे डिजिटायझेशन करणे आदी अटी गाळप परवान्यांसाठी घालण्यात आल्या आहेत.