यंदा साखर उतारा अन्‌ उत्पादनही वाढले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील साखर कारखानदारीसाठी यंदाचा हंगाम कठीण जाणार, असे अंदाज खोटे ठरवत हा हंगाम यशस्वी समारोपाकडे जात आहे. ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. यंदा गतवर्षीपेक्षा साखर उत्पादन वाढले, तसेच उताराही लक्षणीयपणे वाढला आहे.

महाराष्ट्रात 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून राज्यातील साखरेचे उत्पादन 109 लाख टनांजवळ पोहोचले आहे. तसेच राज्यात साखरेचे उत्पादनही गेल्या हंगामापेक्षा जास्त झाले आहे. चालू हंगामात अद्याप 22 साखर कारखाने सुरू आहेत.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, या हंगामात एकूण 207 साखर कारखान्यांना गळीतासाठी परवाने मिळाले होते. त्यात 103 सहकारी आणि 104 खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. 11 एप्रिल 2024 पर्यंत 1063.03 लाख टन उसाचे गाळप झाले असून राज्यात 1089.49 लाख क्विंटल (108.94 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गत हंगामात 211 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि 1053.91 लाख टन उसाचे गाळप करून 1052.3 लाख क्विंटल (105.3 लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते. यंदाच्या हंगामात आतापर्यंत साखरेची रिकव्हरी 10.25 टक्के आहे, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत ती 10.00 टक्के होती.

महाराष्ट्रात चालू हंगामात 185 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे, तर गेल्या हंगामात 11 एप्रिलपर्यंत 211 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. तसेच या हंगामात साखरेच्या रिकव्हरीतही वाढ दिसून येत आहे.

कोल्हापूर विभागात 39 साखर कारखाने, सोलापूर विभागात 48 साखर कारखाने, पुणे विभागात 27 साखर कारखाने, अहमदनगर विभागात 18 साखर कारखाने, छत्रपती संभाजीनगर विभागात 19 साखर कारखाने, नांदेड विभागात 28 साखर कारखाने, नागपूर विभागात 2 साखर कारखाने आणि अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »