मतदान महत्त्वाचेच, पण पोटदेखील महत्त्वाचे; गाळप हंगाम अखेर सुरू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अखेर मंत्री समितीच्या निर्णयाप्रमाणे १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. साखर आयुक्तांनी पात्र कारखान्यांना ऑनलाइन गाळप परवान्यांचे वाटप सुरू केले आणि मतापेक्षा पोट अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. मात्र २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आल्याने, सर्व साखर कर्मचारी आणि कामगारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी संपूर्ण काळजी घेण्याची हमी साखर उद्योगाने या आधीच सरकारला आणि निवडणूक आयोगाला दिलेली आहे.

या विषयावर महाराष्ट्रातील साखर उद्योगाने आणि सर्व संबंधित घटकांनी घेतलेल्या भूमिकेचे ‘शुगरटुडे’ स्वागत करत आहे. वास्तविक राज्य सरकारच्या मंत्री समितीने सर्व बाबींचा विचार करून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा मुहूर्त १५ नोव्हेंबर २०२४ या निश्चित केला होता. मात्र साखर उद्योगाचे अर्थकारण आणि सर्वसामान्यांचे जीवनचक्र माहिती नसलेल्या तथाकथित नेत्यांनी हंगाम पुढे ढकलण्याची विक्षिप्त मागणी केल्याने वातावरण गढूळ झाले आणि गळीत हंगाम विधानसभा निवडणुकीनंतरच सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली. काही बेजबाबदार प्रसिद्धी माध्यमांनीही या चर्चेला हवा दिल्याने यंदाच्या हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. मात्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, विस्मा आणि अन्य घटकांनी ठाम भूमिका घेतल्याने ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे हंगाम सुरू होत आहे, याचे प्रचंड समाधान आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनीदेखील या संदर्भात चांगली भूमिका घेतली आहे. संभ्रमाचे वातावरण असताना राज्य सरकारच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी गाळप परवाने वितरण सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाने सुमारे १०२ साखर कारखान्यांना गाळप परवानेदेखील जारी केले आहेत.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ‘‘मंत्री समितीने निश्चित केल्यानुसार किंवा निवडणूक आयोगाने काही सूचना केल्यास त्यानुसार साखर कारखान्याला कामकाज करावे लागेल,’’ अशी अट परवाना देताना टाकण्यात आलेली आहे.

दरम्यान, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आणि ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘‘यंदा गाळपाला उशीर झाल्यामुळे साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. परंतु, आणखी उशीर होणार नाही याची काळजी घेतल्यामुळे आम्ही साखर आयुक्तालय व राज्य सरकारचे अभिनंदन करतो,’’ असे ठोंबरे म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »