दुबळी समिती नेमून विश्वासघात केला : राजू शेट्टी

ऊस दर नियंत्रण समिती नियुक्त्यांमध्ये शेतकरी नेत्यांना डावलले
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आणि सदाभाऊ खोत यांना राज्य सरकारच्या ऊस दर नियंत्रण समिती सदस्य पदांच्या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आले आहे.
ऊस दर नियंत्रण समितीमध्ये सुहास पाटील, सचिनकुमार नलवडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सहकरी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत परिचारक, कैलास तांबे, खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून दामोदर नवपुते, आनंदराव राऊत यांचा समावेश केला आहे.
गेल्या वर्षभरापासून ऊस दर नियंत्रण समिती नसल्याने राजू शेट्टी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ऊस दर नियंत्रण समितीसाठी आम्हाला वर्षभर इशारे द्यावे लागले, आंदोलनं करावी लागली. ही समिती नसल्याने गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची क्षमता असून सुद्धा मागील वर्षाची अंतिम बिले मिळालेली नाहीत. यावर्षी सुद्धा एफआरपी देऊन ऊसाचे पैसे अनेक कारखान्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत कारखान्यांवर अंकूश ठेवून त्यांचाच काटेकोर हिशेब तपासून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी सक्षम ऊस दर समितीची गरज होती, पण सरकारने दुबळी समिती नेमून विश्वासघात केला आहे.