अजितदादांच्या साखर कारखान्यांना खा. सुप्रिया सुळे यांचे सवाल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘माळेगाव’, ‘सोमेश्वर’वर बैठका; मात्र अध्यक्ष गैरहजर

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उसाच्या पहिल्या उचलीच्या मागणीसाठी ११ रोजी भेटी दिल्या; पण अध्यक्ष व उपाध्यक्षांसह कारखान्याच्या संचालकांनीही यावेळी उपस्थित राहणे टाळले. खा. सुळे यांनी बारामती तालुक्यातील साखरेच्या राजकारणात एंट्री मारल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

पदाधिकारी नसल्याने खा. सुळे यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसोबत चर्चा केली. अनेक प्रश्नांचा भडिमार केला.
सोमेश्वर कारखान्याच्या भेटीवेळी त्यांनी कार्यकारी संचालकांसह अधिकाऱ्यांशी विविध प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधला, मात्र संचालक मंडळाच्या अनुपस्थितीमुळे निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रीतसर पत्र देऊन अध्यक्ष व संचालकांच्या सोयीने पंधरा दिवसांत पुन्हा संचालक मंडळासोबत बैठक लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात शनिवारी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ‘शरयू’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, ‘सोमेश्वर’चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सचिव कालिदास निकम, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, उद्योजक राजेंद्र जगताप, अॅड. एस. एन. जगताप, लक्ष्मणराव चव्हाण, हंबीरराव जगताप, प्रवीण भोसले, बिंटू शेडकर, वनिता बनकर, शशिकांत काकडे, प्रदीप शेडकर, प्रदीप कणसे आदी यावेळी उपस्थित होते.

Supriya Sule MP meeting

यावेळी राजेंद्र जगताप यांनी, उपपदार्थाच्या रकमा, वसूल रकमांचा वापर करून तसेच बँकेकडून आणखी उचल घेऊन शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ३००० ते ३२०० रुपये दर द्यावा, अशी मागणी मांडली, तसेच, मागील हंगामात चुकीचे मूल्यांकन करत काही उद्देशासाठी जास्त काढल्याने उचल घटली, असा आरोप केला. यावर राजेंद्र यादव म्हणाले, मागील हंगामात ४५ कोटी वाढावा उपलब्ध होता. चालू हंगामात ती तूट आहे. साखरेचे दर घटल्याने बँकेकडून २४१० रुपये उपलब्ध होतात. मोलासेस, बर्गसविक्रीच्या मदतीने २८०० दिले आहेत. बीज, इथेनॉलचे पैसे वेळेत मिळत नाहीत. हंगामाअखेर ३५० रुपये आणखी देणार आहोत, अशी माहिती दिली. सुळे यांनी टेंडरसाठी ऑनलाइन पद्धती का वापरत नाही, असा प्रश्न विचारला. ऑनलाइन करत होतो, मात्र ऑफलाईनलाच अधिक संख्येने स्पर्धक उपलब्ध होतात, अशी माहिती यादव यांनी दिली.

सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाला रीतसर पत्र देऊन ऊस दराबाबत अध्यक्ष व संचालक मंडळाची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. जर संचालक मंडळाने पुन्हा भेटणे टाळले तर कारखान्याच्या दारात ठिय्या मांडू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला.

ऊस उत्पादक नाराज आहेत : सुळे
“माळेगाव, सोमेश्वर आणि छत्रपती साखर कारखान्यांनी यंदा एकसारखा २८०० रुपये उसाला पहिला हप्ता दिला. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत, असे खा. सुळे माळेगाव कारखाना भेटीत म्हणाल्या.
साखरेची एमएसपी व साखर निर्यातीचे धोरण केंद्र सरकारने निकाली काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळण्यासाठी मी संसदेमध्ये सत्ताधा-यांविरुद्ध लढा देत आहे. यामध्ये मात्र साखर कारखानदार शेतकऱ्यांसाठी का भांडत नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असेही त्या म्हणाल्या.
कारखाना प्रशासनाच्या वतीने कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, संचालक नितीन सातव यांनी बाजू मांडली. या वेळी पोपट निगडे, सुशील जगताप, अॅड. राजेंद्र काटे आदींनी उसाला ३९०० पहिला हप्ता मिळावा अशी मागणी केली व कमी रिकव्हरीबाबत आवाज उठविला.
यावर संचालक नितीन सातव यांनी म्हणाले, ‘राज्यात एफआरपीपेक्षा अधिकची प्रथम क्रमांकाची रक्कम देण्याची माळेगावची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सरकारकडून साखरेची एमएसपी ठरली नाही, साखरेचे निर्यातीचे धोरण निश्चित नाही. साखरेचे दर ३१०० पर्यंत खाली आले आहेत. परिणामी पहिला हप्ता अधिकचा देणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही हंगाम संपल्यानंतर ३५० पेक्षा अधिकचा दुसरा हप्ता देण्यास माळेगाव बांधिल आहे.’
यावेळी वनिता बनकर, अॅड. एस. एन. जगताप, गौरव जाधव, राजेंद्र जगताप, शिरुभाऊ येळे, भारत कदम, अनिल जगताप, गणपत देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »