‘स्वाभिमानी’चा १३ रोजी साखर संकुलावर धडक मोर्चा

कोल्हापूर : मागील वर्षांच्या उसाला कारखान्यांनी ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी येत्या १३ सप्टेंबर रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
होणाऱ्या धडक मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी केले आहे.
मागील वर्षाच्या उसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता साखर कारखान्यांनी द्यायलाच हवा. कारण बाजारात साखरेचे दर वाढलेले आहेत. शिवाय कारखान्यांनी इतर उपपदार्थ उत्पादित करून मोठी कमाई केली आहे. त्यामुळे कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देणे लागतात, अशी ‘स्वाभिमानी’ची भूमिका आहे.
कागल येथे झालेल्या समन्वय बैठकीला कोंडेकर, बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, राजेंद्र बागल, युवराज गुरव, नीतेश कोगनोळी, नामदेव भराडे, अजित गुरव, पांडुरंग चौगुले, सुरेश बेनाडे, रमेश मांडवकर आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.