‘माळेगाव’मध्ये संचालक मंडळाची मनमानी : तावरे
पुणे : ‘माळेगाव साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली जात नाही, अशी जाहीर तक्रार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
२३ डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्र. ६ मध्ये प्रातिनिधिक कामगार संघटनांनी दिलेल्या पत्रामधील मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेणे हा होता. याबाबत दोन दिवसांपासून कामगार संघटनांच्या पत्रातील माहिती आम्हाला मिळावी यासाठी प्रयत्न केले; मात्र याबाबत कोणतीच महिती न देता हा विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला,’ असा आरोपही तावरे यांनी केला.
‘कामगार भरतीला आमचा विरोध नाही, तथापि नाहक व चुकीच्या पद्धतीने कामगार भरती केल्याने गेल्या वर्षीच्या कारखान्याच्या वार्षिक अहवालात सोमेश्वर कारखान्यापेक्षा प्रति टनाला ६० रुपये जादा खर्च कामगारांच्या पगारावर झाला असल्याचा आक्षेप तावरे यांनी घेतला.
वार्षिक सभेमध्ये ठरल्यानुसार डिस्टिलरी क्षमता २४० केएलपीडी करण्याला सभासदांनी विरोध केला, तर ५०० केएलपीडी क्षमतेची मागणी आम्ही केली. त्या वेळी अध्यक्षांनी याला मंजुरी देत सर्वांशी आणि व्हीएसआयच्या तज्ज्ञांची एकत्र बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले; मात्र याबाबत वारंवार मागणी करूनदेखील या बैठकीचे आयोजन केले जात नसून मनमानी पद्धतीने डिस्टिलरीची क्षमता २४० केएलपीडी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप तावरे यांनी केला.
एम. डी. अशोक पाटील यांना देखील काही कागदपत्रे दाखवली जात नाहीत, असा दावा तावरे यांनी केला.
शेजारील सर्व कारखान्यांनी पहिली उचल जास्तीची घोषित केली असून माळेगावने देखील ३ हजार २०० रुपये प्रतिटन देणे गरजेचे असताना ३ हजार रुपये देऊ केले आहेत, त्यामुळे गेटकेनचा ऊस कमी मिळून गाळप कमी होण्याची भीती तावरे यांनी व्यक्त केली.
या वेळी संचालक अॅड. जी. बी गावडे, राजेश देवकाते, चिंतामणी नवले, जनार्दन झांबरे, युवराज तावरे, संग्राम काटे, रणजित खलाटे, अॅड. शामरान कोकरे, रोहित जगताप, प्रमोद तावरे, नेताजी गवारे आदी उपस्थित होते.