ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळून खाक; अडीच लाखांचे नुकसान

सांगली(वाळवा) : वाळवा तालुक्यातील शिगाव येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने, सर्व मजूर ऊसतोडीसाठी शेतात गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये मजुरांचे कपडे, अन्नधान्य, अंथरूण-पांघरूण आणि कष्टाची रोख रक्कम जळून भस्मसात झाली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २ ते २.५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हे मजूर वारणा आणि शरद साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीचे काम करत होते. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून गरीब ऊसतोड मजुरांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. थंडीच्या दिवसात सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबांना मदतीची नितांत गरज आहे.
तातडीची मदत आणि प्रशासकीय मागणी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते नीलेश बारवडे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी बाधित मजूर कुटुंबांना तातडीने अन्नधान्य, कपडे आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.






