साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची गरज

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी
पुणे : साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सध्या उद्योग अडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची गरज असल्याचे मत व्यक्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलचे दर झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे साखर कारखान्यांचा इथेनॉल कोटा तातडीने वाढवण्याची मागणीही केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणामुळे दरवाढीचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. इथेनॉलचे दर ६०–६५ रुपये प्रति लीटर असताना क्रूड ऑइलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशात २००० कोटी लीटर इथेनॉल निर्मितीची क्षमता असून, केंद्राने १५० कोटी लीटरचे टेंडर काढल्यास कारखाने सिरप, बी-हेवी मोलॅसिस तसेच धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करू शकतील. पाटील यांनी साखर निर्यातीसंदर्भातही मदतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. सध्या १५ लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून, त्यातील काही प्रमाण युद्धामुळे समुद्रात अडकले आहे. त्यामुळे केंद्राने साखरेची एमएसपी प्रति किलो ₹४१ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.






