शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकेल : बोत्रे पाटील

पुणे/श्रीगोंदा: “शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करून त्यांना उसाचा योग्य मोबदला दिला, तरच साखर उद्योग भविष्यात टिकू शकेल,” असे मत ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज (युनिट४) कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालू हंगामात गौरी शुगरने आतापर्यंत ५लाख १०हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक गाळप करणारा ‘क्रमांक १’ चा कारखाना म्हणून गौरी शुगरने नावलौकिक मिळवला आहे या हंगामात एकूण १० लाख मेट्रिक टनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस इतरत्र कुठेही वजन करून मगच आमच्या कारखान्याला पाठवला तरी आमची हरकत नाही, असे खुले आवाहन बोत्रे पाटील यांनी दिले, ज्यातून कारखान्याच्या काट्यावरील पारदर्शकता स्पष्ट होते. तसेच शेतकऱ्यांचा वाढता विश्वास, व्यवस्थापनाचे नियोजन आणि आधुनिक यंत्रसामग्री यामुळेच कारखान्याने गाळपात आघाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
साखर कारखाने हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या जिवावर चालतात. त्यामुळे ऊस उत्पादकांना योग्य दर देणे ही ओंकार ग्रुपची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांत अनेक साखर कारखाने बंद पडल्याने स्थानिक आर्थिक उलाढाल झाली होती. मात्र, ओंकार ग्रुपच्या माध्यमातून बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून, अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे बोत्रे पाटील म्हणाले.





