गतवर्षीच्या उसाला जादा २०० रु. मिळवून देणारच : शेट्टी

जयसिंगपुरात २५ ला ऊस परिषद : शेट्टी
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे २३ वी ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.
गेल्या वर्षी कारखान्यांना घातलेल्या उसाला प्रति टन २०० रूपये मी तुम्हाला मिळवून देईन, मात्र त्यासाठी या परिषदेला मोठ्या संख्येने ‘यावं लागतंय’, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
जयसिंगपुरातील विक्रमसिंह क्रीडांगणावर दुपारी तीन वाजता ही परिषद होणार आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे साखर कारखानदार हादरले आहेत. आमची संघटना त्यांच्या डोळ्यात सलू लागली आहे, मात्र आम्ही शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसासाठी टनामागे दोनशे रूपये मिळवून देणार आहोत. या मागणीसाठी शेतकऱ्यांची एकजूट दाखवून, तुमचा आवाज बुलंद होऊ द्या, त्यासाठी परिषदेला या, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.