‘विघ्नहर’च्या कामगारांना १५ टक्के बोनस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उसाला ३,०५० अंतिम भाव, ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ


पुणे – श्री विघ्नहर साखर कारखान्याने यंदा अंतिम भाव विना कपात ३,०५० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत २,७५० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम शुक्रवारी (ता. ३) खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगारांनाही १५ टक्के प्रमाणे बोनस, फरकाची रक्कम व इतर देणी दिवाळीपूर्वी अदा करणार आहे, अशी ग्वाही अध्यक्ष सत्यशील शेरकर दिली.

निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी येथे साध्या पद्धतीने करण्यात आला. सकल मराठा समाज समन्वयक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकली.

यावेळी कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, सकल मराठा समाज समन्वयक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सभासद ऊस उत्पादक तसेच अधिकारी व कामगार उपस्थित होते. अरुण थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार तर कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले.

यंदा गाळप हंगाम २०२३-२४ साठी सुमारे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करणार असल्याचे शेरकर यांनी सांगितले. साखरेचे व इथेनॉलचे दर पुढील वर्षीही चांगले राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तसेच पुढील वर्षीही उसाची लागवड वाढेल. त्याला चांगला बाजारभाव मिळेल. इतर शेतीमालाचे अनिश्चित असलेले बाजारभाव लक्षात घेता उसाला हक्काचा बाजारभाव मिळतो. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »