‘यशवंत’ची जमीन विकण्याचे दोन भावांचे षड्यंत्र : विकास लवांडे

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन विकण्यास बहुतांश सभासदांचा विरोध असताना, दोन भावांनी ती कवडीमोल किंमतीस विकण्याचे षड्यंत्र रचले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रवक्ते आणि कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी अध्यक्ष सुभाष जगताप आणि त्यांच्या बंधूंवर केला आहे.
कारखान्याच्या विशेष सभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर लवांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यशवंत कारखाना १४ वर्षांपासून बंद आहे. त्याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे तेव्हाच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले होते. तसेच संचालक मंडळाकडून १४ कोटींची वसुली करण्याचा आदेश झाला होता; परंतु नंतर सरकार बदलल्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करून १४ कोटींच्या वसुलीस स्थगिती दिली.
गेल्या दहा महिन्यांपासून जे नवे संचालक मंडळ निवडून आले आहे, त्यातील अध्यक्षपदी असलेले सुभाष जगताप आणि त्यांचे सख्खे थोरले बंधू, हवेली कृषी बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांनी संगनमत करून परवाच्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळातच आपल्या हस्तकांकरवी जमीन विक्रीचा ठरावासह इतर दहा ठराव मंजूर करून घेतले. हा प्रकार बेकायदेशीर असून, आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे लवांडे यांनी म्हटले आहे.