इथेनॉल : ‘विस्मा’ची पुण्यात तातडीची बैठक

पुणे : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाविषयी गुरुवारी जारी केलेल्या आदेशावर चर्चा करण्यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) शुक्रवारी (८ डिसेंबर) तातडीची बैठक बोलावली आहे.
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, या बैठकीत केंद्र सरकारच्या आदेशावर सविस्तर चर्चा होईल आणि ‘विस्मा’ची भूमिका ठरवली जाईल. तोपर्यंत या विषयावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.
केंद्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने एक आदेश जारी करून साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यास बंदी घातली आहे. हा आदेश या हंगामापुरता आहे. मात्र बी हेवी आणि सी हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर कसलेही बंधन नाही.
या निर्णयावर साखर उद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.